स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघात पराभव झाला आहे. त्या जागेवर आता शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी झाले आहेत. त्यांनी ९६ हजार ३९ मतांनी शेट्टींचा पराभव केला आहे. यावर राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकांचा कौल आपल्याला मान्य आहे, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. याशिवाय शेतकरी चळवळ आपण आपल्या परिने सुरु ठेवणार असे देखील ते म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी?
पराभवानंतर राजू शेट्टी म्हणाले की, लोकांना माझ्यापेक्षा चांगला खासदार हवा, असं वाटत असेल तर त्याचा स्विकार करायला हवा. आपल्या मतदारांचा कल मान्य आहे. यापुढेही शेतकरी चळवळीत वेगवेगळ्या पद्धतीने काम करत राहील. याअगोदर दिल्लीत जाऊन शेतकऱ्याची बाजू मांडायचो आता रस्त्यावरची लढाई करुन शेतकऱ्यांसाठी काम करणार.
‘भाजप नेत्यांनी जातीचे मुद्दे उपस्थित करुन विषारी राजकारण केलं’
‘भाजप नेत्यांनी जातीचे मुद्दे उपस्थित करुन विषारी राजकारण केलं’, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातून पराभव झाला आहे. या पराभवानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी भाजपच्या उमेदवारांवर टीका केली आहे. भाजपच्या नेत्यांकडून जातीच भावनिक मुद्दे उपस्थित करुन लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला गेलाचे राजू शेट्टी म्हणाले.