घरमहाराष्ट्रथैल्या, आकडा, खोके या शब्दांभोवतीच... ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

थैल्या, आकडा, खोके या शब्दांभोवतीच… ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जातात, पण नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगरातील ज्या सरकारी इस्पितळांत औषधोपचारांअभावी रुग्णांच्या मृत्यूचे तांडव सुरू आहे तेथे जात नाहीत. बळी गेलेल्या नवजात शिशूंच्या दुर्दैवी मातांचे अश्रू पुसावेत, असे त्यांना वाटत नाही. यमाच्या रेड्यावर बसून ते फक्त मदतीचा आकडा जाहीर करीत आहेत. थैल्या, आकडा, खोके या तीन शब्दांभोवतीच त्यांच्या राजकीय जीवनाचे सार गुंतले आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – नांदेडचे मृत्यू भ्रष्टाचाराच्या साथीचे बळी-उद्धव ठाकरे

- Advertisement -

शिंदे गटाच्या विचारांतून, कृतीतून, जाहिरातींतून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव व छायाचित्र आता हटवले गेले आहे. आता फक्त ‘मोदी मोदी-शहा शहा’चा गजर सुरू आहे. उद्या ते शिवसेनेची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाली, मोदींचीच शिवसेना खरी असे बोलायलाही कमी करणार नाहीत, अशी खरपूस टीका शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रेलखात करण्यात आली आहे.

दिल्लीकडून महाराष्ट्रावर घाव

भाजपाने शिवसेनेशी उभा दावा मांडला व त्यासाठी शिंदे आणि त्यांच्या चाळीस लोकांना हाताशी धरले ते यासाठीच. महाराष्ट्राचे अतोनात नुकसान या लोकांनी केले. दिल्लीकडून महाराष्ट्रावर इतके घाव घातले जात असताना राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र हिताची एक तरी ‘बात’ केली आहे काय? मुंबईची लूट व ओरबाडणे सुरू असताना यांचा जीव जळतोय का? तर अजिबात नाही, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात; आज ‘या’ शहरांत पडणार पाऊस, IMD चे अपडेट

शिवरायांची वाघनखे तुमच्यावरच उलटतील

छत्रपती शिवरायांची वाघनखे लंडन येथून आणण्याचा उपक्रम सुरू आहे. मात्र येथे महाराष्ट्रात सध्या जुलमी अफझल खानाची राजवट आहे आणि दिल्लीतून ‘खानां’चे महाराष्ट्रावर हल्ले सुरूच आहेत. अशा वेळी ‘वाघनखे’ आणून कोणाचे कोथळे तुम्ही काढणार आहात? वाघनखांचे तेज आणि वजन तुम्हाला पेलवणार आहे काय? वाघनखांनी दिल्लीचा कोथळा काढला. तुम्ही तर दिल्ली दरबारातील पाच हजारी मनसबदार बनून नव्या ‘शाह्यां’वर चवऱ्या ढाळीत आहात. हे महाराष्ट्राचे सध्याचे चित्र आहे. तेव्हा शिवरायांची वाघनखे तुमच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -