आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक सातत्याने पत्रकार परिषद घेऊन नवे गौप्यस्फोट करत आहेत. अशातच आज पुन्हा पत्रकार परिषद घेत त्यांनी आर्यन खानला अटक केल्यानंतर या प्रकरणाची मी पोलखोल करत असल्याने एनसीबीचे धाबे दणाणले आहेत. यानंतर शाहरुख खानालाही घाबरवण्याचे प्रयत्न झाल्याचे आरोप त्यांनी केले. तसेच या प्रकरणातील पीडित शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने न घाबरता पुढे यावे असं आवाहन त्यांनी केले आहे.
यावर बोलताना मलिक म्हणाले की, “पूजा ददलानी प्रकरणाचे नाव या प्रकरणात घेतले जातेय. तुम्ही ५० लाख रुपये दिल्याने तुम्हालाही आरोपी केले जाईल असं त्यांना घाबवरलं जातयं. पण पीडित पूजा ददलानीने घाबरू नये, असं आवाहन मलिक यांनी केलं आहे. तसेच आतापर्यंत झालेल्या कारवाईत ज्यांच्या ज्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले आहेत. त्या सर्व लोकांनी पुढे येऊन एनसीबीची पोलखोल करावी. कुणीही घाबरून जाऊ नये. तुम्ही पीडित आहात. त्यामुळे उघडपणे समोर या,” असं आवानही मलिक यांनी केले आहे.
“मी या प्रकरणाची पोलखोल करण्यास सुरुवात केल्याने एनसीबीचे धाबे दणाणले. दरम्यान अभिनेता शाहरुख खानलाही घाबरवण्याचे प्रयत्न झाले. नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तेरा बेटा लंबा जायेगा असा शब्दात शाहरुखला घाबरवण्याचे प्रयत्न झाले.” असा दावा मलिकांनी केला.
“पडद्यामागे काय सुरु आहे माहित नाही. मात्र वानखेडे कोणाला फोन करतात हे मी नंतर उघड करेन, महिलांनाही धमकावलं जातयं. त्याचीही माहिती उघड करेन. आर्यन खानप्रकरणी १८ कोटी रुपयांची डील झाली होती. ५० लाख रुपये उचललेही होते. पण एका सेल्फीने सर्व खेळ बिघडलून टाकला. मोहित कंबोज आर्यन खानच्या अपहरणातील मुख्य सूत्रधार होता. तसेच खंडणी वसूलीतही मोहित कंबोज वानखेडेंचा साथीदार आहे,” असा दावाही मलिकांनी केला आहे.