आमदार नितेश राणेंचा शोध घेत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले असून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप आमदार ॲड. आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. ॲड. आशिष शेलार यांनी हे सरकार तालिबान्यांसारखे वागत असल्याची घणाघाती टीका शेलारांनी केली.
नारायण राणे यांना पाठवलेल्या नोटीसवरुन ॲड. आशिष शेलार यांनी ट्विट करत टीका केली. “कोणत्याही प्रकारची चूक केली नसताना, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्राचे पोलीस नोटीस बजावून आमच्या समोर येऊन उभे रहा असे आदेश देतात…वारे वा..ठाकरे सरकार! फुले, शाहू, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे! अशी खरमरीत टीका ठाकरे सरकारवर आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे केली आहे.
कोणत्याही प्रकारची चूक केली नसताना, केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांना महाराष्ट्राचे पोलिस नोटीस बजावून आमच्या समोर येऊन उभे रहा असे आदेश देतात…
वारे वा..ठाकरे सरकार!
फुले, शाहू, आणि डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे! pic.twitter.com/309mBmn382— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 29, 2021
नारायण राणेंना नोटीस
शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्गमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. नॉट रिचेबल असेलल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आज दुपारी तीन वाजता कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहण्यात यावे असे पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर दिलं होतं. तसंच ते कुठे आहेत हे मला माहित असेल तरी मी तुम्हाला का सांगावं? असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी पत्रकारांना उत्तर देताना केला होता. त्याच अनुषंगाने पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.