मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज शनिवारी (23 डिसेंबर) बीड येथे इशारा सभा पुढील काही तासांत सुरू होणार आहे. या सभेतून जरांगे त्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. असे असतानाच प्रशासनाने सभेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. प्रशासनाच्या या निर्णयानंतर मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले असून, कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याचे कारण काय? असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला आहे. त्यांच्या प्रश्नाचा जरांगे जाहीर सभेतून कसा समाचार घेतात हे पहावे लागणार आहे. (Bhujbal Vs Jarange What is the reason for declaring holidays for schools for meetings? Bhujbals question to the government)
मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात रंगत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम असून, त्यांनी राज्य सरकारला दिलेली 24 डिसेंबरची मुदत उद्या रविवारी संपणार आहे. अशातच मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा आज शनिवारी (23 डिसेंबर) रोजी बीड येथे होत असलेल्या इशारा सभेतून स्पष्ट करणार असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली. आज होत असलेल्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून बीड शहर आणि परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचा मंत्री छगन भुजबळ यांनी निषेध करत प्रशासनाला थेट सवाल केला आहे.
खबरदारी म्हणून प्रशासनाने असा घेतला निर्णय
मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाने शहरातील मराठी, इंग्रजी माध्यमातील सगळ्याच शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. बीड शहरालगत आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे आणि यावेळी एकीकडे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केलेला असतानाच शहरांमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली निघणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना कोणताही त्रास होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : Sawant Vs Pawar : ‘स्टॅम्प पेपरवर लिहून देतो’, दादांच्या वक्तव्याचा सावंतानी घेतला समाचार; म्हणाले-
भुजबळांनी धरले प्रशासनाला धारेवर
बीड जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्वीटरवर पोस्टमध्ये लिहिले की, कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे कारण काय? असा थेट सवाल त्यांनी सुरुवातीलाच प्रशासनाला विचारला आहे. पुढे पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, कोणत्याही सभा, मेळावे याबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणं किंवा सुट्टी जाहीर करणं नक्कीच चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात होणार असलेल्या मनोज जरांगे यांच्या सभेमुळे जिल्हा परिषदेने आपल्या प्राथमिक शाळांना थेट सुट्टी जाहीर केल्याचे पत्रक काढले होते. त्याविरोधात आवाज उठविल्यानंतर रात्री उशिरा ती सुट्टीची सूचना मागे घेण्यात आली. त्याविरोधात मी जाहीर सभा, प्रसारमाध्यमे आणि विधानभवनातही आवाज उठवला होता.
आता पुन्हा बीड जिल्ह्यात जरांगे यांच्या सभेसाठी बीड शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. हे या राज्यात नेमकं काय सुरू आहे? पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सभांच्या दिवशी देखील अशा प्रकारे शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी ही विशेष व्यवस्था कशासाठी? मराठा आरक्षणाला किंवा त्यासाठी सुरू असलेल्या सभांना माझाच काय, कोणाचाही विरोध नाही. परंतु ही झुंडशाही, हुकूमशाही सुरू आहे, त्याला मात्र नक्कीच विरोध आहे. मराठा समाजातील सुज्ज्ञ बंधू-भगिनींना देखील हे अजिबात पटणार नाही. यातून आपण काय संदेश देण्याचा प्रयत्न करतोय? एका समाजातील काही ठराविक लोकांच्या दबावाला, झुंडशाहीला आपला कायदा, प्रशासन बळी पडतंय का? असं असेल तर हे निश्चितच लोकशाहीला धरून नाही.
शालेय शिक्षण विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. नसता महाराष्ट्रातील इतर समाजांमध्ये यामुळे चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे. अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला असून, त्यांच्या या पोस्टची कशी दखल घेतली जाते हे पहावे लागणार आहे.
कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याचे कारण काय?
कोणत्याही सभा, मेळावे यांबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणं किंवा सुट्टी जाहीर करणं नक्कीच चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात होणार असलेल्या मनोज जरांगे यांच्या… pic.twitter.com/ZfvvcvJVpx
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 23, 2023
हेही वाचा : Bacchu Kadu : बच्चू कडू जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सामील होणार
गुणरत्न सदावर्ते यांनाही घेतला आक्षेप
बीडचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांनी शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “बीड शहरातील सर्व शाळा 23 डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात यावे. याबाबत दक्षता घ्यावी” असे पत्रात म्हटले आहे. बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा गुणरत्न सदावर्ते यांनीही निषेध केला आहे. ते म्हणाले की, राईट टू एज्युकेशन अधिकारानुसार अशाप्रकारे शाळा बंद ठेवणे गैर आहे. त्यामुळे असा निर्णय घेणारे बीडचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांचे निलंबन केलं पाहिजे अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.