राज्यात सध्या कोरोनाचे संकट असताना आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. करोनाचे संकट संपल्यानंतर काँग्रेसमध्ये देश पातळीवर तीन आणि राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. एवढेच नाही काँग्रसचे दोन तरूण नेते आणि एक ज्येष्ठ नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका खासगी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे.
काँग्रेस नेतृत्व नाराज
दरम्यान, केंद्रातील काँग्रेस नेतृत्व महाराष्ट्र काँग्रेसवर नाराज असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कोरोनामध्ये काँग्रेसचे राज्यात अस्तित्व दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हेच पिक्चरमध्ये आहेत. आता टोपेही दिसत नाही, असा चिमटा काढतानाच काँग्रेसचं देशपातळीवर नाहीच, पण राज्यपातळीवरही अस्तित्व उरलेलं नसल्याची त्यांनी टीका केली. दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली असून, बाळासाहेब थोरात तुम्ही सांभाळा, तुमचा पक्ष जपा, तुम्हाला कुठेही भवितव्य नसल्याचे म्हटले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसला जपता आले नाही तर इतरांना काँग्रेस काय सांभाळणार? अशी टीका देखील त्यांनी केली.
खडसेंवरही टीका
विधान परिषदेचे तिकीट न मिळाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज झाले होते. यावर चंद्रकांत पाटील यांनी टीका करत भाजपा हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन काम करतो. आमच्या अजेंड्यामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशाच कार्यपद्धती हा आमच्या अजेंड्याचा भाग आहे. केवळ घरामधल्यांना मोठं करणं हा आरएसएसचा अजेंडा नसल्याचे त्यांनी सांगत एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. तसेच चार तिकिटं असताना ४० जणं इच्छुक अशी स्थिती आहे. त्यामुळे काही जणांना न्याय मिळतो. त्याचवेळी काही जणांवर अन्यायही होतो, असे देखील ते म्हणालेत.