घरमहाराष्ट्रखड्यांमुळे झाला मृत्यू; मनपा प्रशासनाने नाकारली मदत

खड्यांमुळे झाला मृत्यू; मनपा प्रशासनाने नाकारली मदत

Subscribe

खड्यामुळे मृत्यू झालेल्या समाजसेवकाच्या कुटुंबियांना अल्हासनगर मनपा प्रशासनाने मदत नाकारली आहे.

आपल्या ॲक्टिव्हा स्कुटरवर रस्त्याने जात असतांना खड्ड्यात पडल्याने समाजसेवक भरत खरे यांना १३ फेब्रुवारी २०१९ रोजी जीव गमवावा लागला होता . रस्त्यातील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याने मनपा प्रशासन याला जबाबदार असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला होता. मनपाकडून खरे कुटुंबियांना ५ लाखांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आणि तसा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला होता. मात्र, मनपा प्रशासनाने ही मदत नाकारली आहे. शासन नियमात अशा स्वरूपाची तरतूद नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

‘उल्हासनगर – ४’ येथे लाल चक्की परिसरात राहणारे भरत खरे हे १३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास ॲक्टिव्हा गाडीवरुन राधास्वामी सत्संग चौककडून फालवर लाईनच्या दिशेने येत असतांना रस्त्यातील एका खड्डात त्यांची गाडी आदळली. यामुळे ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना बेशुद्ध अवस्थेत मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना डोंबिवलीच्या ‘एम्स’ आणि नंतर ठाण्याच्या ‘ज्युपिटर’ रुग्णालयात दाखल केले गेले. या रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

मनपाच्या सभेत या प्रकरणाचे तीव्र पडसाद

मनपाच्या सर्वसाधारण सभेत भरत खरे यांच्या अपघात प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे आणि राजेंद्र चौधरी यांनी आरोप केला की भरत खरे यांच्या मृत्यूला उल्हासनगर महानगरपालिका जबाबदार आहे. दरवर्षी करोडो रुपये रस्त्यांवर आणि रस्त्यांचे खड्डे बुजविण्यासाठी केला जातो. मात्र, तरीदेखील खड्डे कायम असतात. भाजप नगरसेवक डॉ. प्रकाश नाथानी म्हणाले होते कि, ‘खड्ड्यांमुळे महानगरपालिका अखेर किती जणांचे बळी घेणार? मला नगरसेवक असल्याची सुद्धा लाज वाटते. पुढचा बळी कोणीही असू शकतो. त्यामुळे खड्ड्यांवर हवे तेवढे खर्च करा पण अशी घटना यापुढे होता कामा नये.’ महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळेच भरत खरे यांचा जीव गेल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद टाले यांनी केला आणि खरे यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली होती. या मागणीला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मनपा उपायुक्त विकास चव्हाण यांनी प्रशासनाने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर देखील केली होती.

काय म्हणाले मनपा आयुक्त?

या घटनेला जवळपास महिना झाला आहे मात्र अद्याप देखील खरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली नाही. याबाबत प्रशासनावर उलटसुलट आरोप होऊ लागले आहेत. या संदर्भात मनपा आयुक्त अच्युत हांगे यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘भरत खरे यांचा मृत्यू हि दुर्दैवी घटना आहे. या घटनेचे आम्हालाही दुःख आहे. मात्र, अशा प्रकारची मदत शासनाच्या नियमात बसत नाही. ‘मेमसाब’ या ईमारत अपघातात देखील ३ जणांचा मृत्यू होता त्यांना देखील आम्ही मदत करू शकत नाही. दोन्ही घटना या नैसर्गिक आपत्ती किंवा तत्सम प्रकारात मोडत नाहीत.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -