राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढतच आहे. ही थंडी आता पुढील 48 तास कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे वाढती थंडी पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उत्तर भारतात वाढलेल्या थंडीमुळे राज्यातील अनेक भागात थंडीची तीव्र लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नागरिकांना एकाच वेळी पाऊस, दाट धुके आणि थंडीची लाट अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 48 तास उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
पुढील ४८ तासांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा दिला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) January 25, 2022
पुढील 48 तासात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ अशा अनेक जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
नागपूर, गोंदियात आजपासून सलग २ दिवस थंडीचा तडाखा कायम
तर 26 जानेवारीला नंदूरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ भागातही दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. तर 27 जानेवारीला गोंदिया, नागपूर, वर्धा भागातही थंडीच्या लाटेचा तडाखा सहन करावा लागणार आहे. यात नागपूर, गोंदियामध्ये आजपासून सलग २ दिवस थंडीचा तडाखा सहन करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.