मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनी ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पोलीस दलातील बदल्यांचं रॅकेट समोर आणून ठाकरे सरकारवर डेटा बॉम्ब टाकला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सत्तेची हाव आणि सरकार अस्थिर करण्यासाठी फडणवीसांचे बेछूट आरोप करत आहेत, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस हे गोलपोस्ट सारखे बदलत आहेत. लक्ष्मी शुक्ला यांनी कॉल इंटरसेप्शन केलं असेल तर ते अनधिकृत आहे. अशा प्रकारचे कॉल इंटरसेप्शन करायचे आदेश त्यावेळी दिले नव्हते. दुसरीकडे फडणवीस सांगतात की, महासंचालकांनी आदेश दिले वगैरे, हे सर्व ऐकीव आहे. फडणवीस जे काही बोलत आहेत, ते ऐकीव माहितीच्या आधारे बोलत आहे, असं सचिन सावंत म्हणाले. जे काही आरोप केले आहेत त्यावर सरकार उत्तर देईल. सरकारकडे याचं उत्तर आहे, असं देखील सचिन सावंत म्हणाले.
खरं तर मूळ मुद्दा होता अँटिलियाच्या बाहेर स्फोटकं सापडणं, मनसुख हिरेनची हत्या होणं. पण फडणवीस आता त्याबद्दल काही बोलत नाहीत व गोलपोस्ट बदलत आहेत. हे सगळं सत्तेची हाव असल्यामुळे आणि सरकार अस्थिर करण्यासाठी ते करत आहेत. काहीही करून पुन्हा सत्तेत येण्यासाठी हे बेछुट आरोप केले जात आहेत. आता फडणवीस केंद्रीय गृहसचिवांकडे सीबीआय चौकशीची मागणी करणार आहेत. यात केंद्राचा काय संबंध? हे सगळं दबावाचं राजकारण केलं जात आहे, असं सचिन सावंत म्हणाले.
हेही वाचा – ठाकरे सरकारवर आता डेटा बॉम्ब; केंद्रीय गृहसचिवांना भेटून ‘त्या’ अहवालाच्या चौकशीची मागणी करणार – फडणवीस