कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून कोविड योद्धे देखील या व्हायरसला बळी पडत आहेत. आतापर्यंत १६६६ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी १६ पोलिसांचा मृत्यू झाला असून ११७७ रुग्ण पोलिसांवर उपचार सुरु आहेत. तर उरलेल्या पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मृत्यू झाले्लया एकूण पोलिसांपैकी १२ पोलीस हे एकट्या मुंबईतील आहेत. काल (गुरुवारी) महाराष्ट्रात तीन पोलिसांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये ठाण्यातील एका महिला पोलिसाचा देखील समावेश होता. तर विलेपार्ले येथील ५५ वर्षीय पोलीस शिपाई आणि पुणे येथील एक पोलीस शिपाई अशा तिघांचा काल दुर्दैवी मृत्यू झााला.
Number of #COVID19 cases rises to 1666 in Maharashtra Police. Number of active cases & deaths stands at 1177 & 16, respectively in the force: Maharashtra Police
— ANI (@ANI) May 22, 2020
महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या आधीपासूनच कलम १४४ लागू करण्यात आले होते. तेव्हापासून पोलीस हे सतत ठिकठिकाणी बंदोबस्ताच्या कामाला लागले होते. तसेच कंटेनमेंट झोन, कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटर येथे देखील पोलिसांना बंदोबस्तासाठी बसविण्यात आले आहे. दिवसरात्र ड्युटी केल्यामुळे अनेक पोलीस कोरोनाच्या संसर्गाला बळी पडले आहेत.
मुंबई हे सर्वाधिक दाटीवाटीची लोकसंख्या असलेले शहर म्हणून ओळखले जाते. लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे सर्वात अवघड काम मुंबई पोलिसांना करावे लागत आहे. मार्कटमधील गर्दीचे व्यवस्थापन असो किंवा स्थलांतरीत मजुरांना शिस्तित श्रमिक ट्रेनमध्ये बसविण्याचे काम असो. मुंबई पोलीस आपली ड्युटी चोख बजावत आहे. यावेळी गर्दीशी संपर्क आल्यानंतर अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला.
मुंबई पोलिसांमधील ५५ वर्षावरील असलेल्या कर्मचाऱ्यांना घरीच थांबवण्याचे आदेश एप्रिल महिन्यात काढण्यात आले होते. तसेच उर्वरीत पोलीस दिवसरात्र काम करत असल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी केंद्रातून CISF आणि CRPF च्या तुकड्या बोलविण्यात आल्या आहेत. ज्यांची नेमणूक धारावी आणि नागपाडा परिसरात करण्यात आली आहे. हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असून तिथे लोकांना नियंत्रणात ठेवणे अवघड झाले आहे.