सोलापूर : राज्यातील राजकारणामध्ये आजचा शुक्रवार राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये गेल्याचा दिसून आला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह शरद पवारांपासून उद्धव ठाकरेपर्यंत आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश होता. सोलापूरमध्ये मीडियाशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले आहे. ठाकरे लिहून दिलेल्या स्क्रिप्टवरच बोलतात असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला आहे. (Fadnavis Vs Uddhav Thackeray Uddhav Thackeray speaks on script written Fadnavis attack)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याच्या भानगडीत मी पडत नाही. कारण त्यांना काहीच माहिती नसतं. त्यांना कुणी तरी स्क्रीप्ट लिहून देतं त्यावर ते बोलतात. मला असं वाटतं की त्यांच्या डाव्या उजव्यांनी त्यांना दिलेल्या स्क्रीप्टवर ते बोलत असतील. एवढंच सांगतो की, सोलापूरमधील रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाला मान्यता माझ्या काळात मिळाली. याचं काम माझ्या काळात सुरू झालं. त्याला सगळ्या परवानग्या माझ्या काळात मिळाल्या. याला निधी मोदींनी दिला. याला आणखी निधी आमचं सरकार आल्यानंतर मिळाला. यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काहीएक वाटा नाही. यामध्ये कतृत्वशुन्य सरकारचा यामध्ये काहीएक वाटा नसल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
मोदींमुळे यांची दुकाने बंद पडली
मोदींच्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केल्यानंतर याबाबत विचारले असताना फडणवीस म्हणाले की, पहिली गोष्ट तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येतात याचं त्यांनी स्वागत केलं पाहीजे. पंतप्रधान मोदी विविध विकासकामांचं लोकार्पण करतायेत, आपल्या राज्याला त्यांनी 28 हजार कोटी दिले याचा त्यांना आनंद वाटला पाहीजे. त्यांच्या काळात त्यांनी फक्त केंद्रावर टीका केली. त्याशिवाय त्यांनी काहीच केलं नाही. मोदी आल्याने यांची दुकानं बंद झाली आहेत. आणि जेव्हा जेव्हा मोदी महाराष्ट्रात येतील तेवढे ते खाली जातील. या भीतीने ते टीका करतायेत.
संयम बाळगला पाहीजे
मराठा आरक्षणासाठी मुंबईत येण्याच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्यं केलं. ते म्हणाले की, राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासंदर्भात पूर्णपणे कटीबद्ध आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये घोषणा केली आहे की, फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणा संदर्भात निर्णय घेऊ. त्यामुळे सगळ्यांनी संयम ठेवला पाहीजे. आणि मुख्यमंत्र्यांना संधी दिली पाहीजे असेही आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.
हेही वाचा : Rajan Salvi : मला कधीही अटक होऊ शकते! राजन साळवींचं मोठं वक्तव्य
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
आज भाजप आणि संघातील अकरा नेत्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, संघर्ष कुणी दुसऱ्यांनीच केला आणि त्याचा लाभ घेणारे आज सत्तेवर बसले आहेत. मला नाही वाटत की संघर्ष आणि त्यांचा काहीएक संबंध आहे. आयती बनवललेली भाकर ते आज खात आहेत. ज्यांनी संघर्ष केला ते आज नाहीत, आणि जे आहेत त्यांना बाजुला सारलेलं आहे. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.