शासकीय योजनेतील पैसे न मिळाल्याने एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. बाळासाहेब मस्के (४२), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या शेतकऱ्यांनी चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘मायबाप सरकार मी आत्महत्या करीत आहे. शासकीय योजनेतील पैसे मिळाले नसल्याने कार्जबाजारी झालो. तर प्रिय बंधू नाना आणि आप्पा ही माझी दोन मुलं आहेत. त्यांना तुमच्या मुलाप्रमाणे सांभाळा, मी जात आहे. मला माफ करा’, असे बाळासाहेर मस्के यांनी लिहिले आहे.
नेमके काय घडले?
बीड जिल्ह्यातील राक्षस भुवन येथे राहणाऱ्या बाळासाहेब मस्के यांना शासकीय पैसे न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोखरा योजना अंतर्गत घेतलेल्या लाभाचे गेले आठ महिने झाले पैसे मिळाले नाहीत. शासकीय योजनेतील शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी पैसे मिळाले नाहीत. गोड्या पाण्यातील मत्स्य पालन केले त्याचे देखील अनुदान मिळाले नाही. यासाठी कर्ज काढले. मात्र, सरकारी निधी मिळाला नाही. कर्जबाजारीपणामुळे मी आत्महत्या करत आहे, असं या शेतकऱ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहिलं आहे. या घटनेमुळे बीड जिल्हात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच शेतकऱ्यांच्या योजनेचे पैसे वेळेत न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
औरंगाबादमध्येही शेतकऱ्याची आत्महत्या
अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यात शेतीकरता घेतलेले कर्ज, लोकांकडून घेतलेली उसनवारी यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला होता. या कर्जबाजारीमुळे औरंगाबादमध्ये राहणाऱ्या आनंद भावले यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा – आंजर्ले येथे बुडून चौघांचा मृत्यू; दोघांना वाचवण्यात यश