राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मागील आठवड्यात राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या जिल्ह्यांची संख्या १५ होती. मात्र या आठवड्यात जिल्ह्यांची संख्या वाढली असून १८वर पोहोचली आहे. मागील आठवड्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांना होम आयसोलेशन न करता कोविड सेंटरमध्ये विलगीकरण करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आज राज्य सरकारने कोरोना रुग्णसंख्या अधिक असलेल्या १८ जिल्ह्यांमधील होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांना उपचारासाठी कोविड सेंटरला जावे लागणार आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोना आणि म्युकरमायकोसिसला आळा घालण्यासंदर्भातील उपयायोजनावर मंत्रालयामध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी १८ जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘राज्यापेक्षा ज्या १८ जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे, तिथे होम आयसोलेशन १०० टक्के बंद करा आणि कोविड केअर सेंटर वाढवा. येथे सगळे लोकं आयसोलेट झाले पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.’
‘या’ १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद
बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर,अकोला, सातारा, वाशिम,बीड,गडचिरोली,अहमदनगर, उस्मानाबाद,रायगड, पुणे आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशनची प्रक्रिया बंद असणार आहे. येथे कोरोना रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाला घरी उपचार घेता येणार नाही आहेत, त्या रुग्णांला कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागणार आहे.
हेही वाचा – Corona Pandemic: कोरोनाचा शिक्षणाला फटका! राज्यसरकारचं दुर्लक्ष, विद्यार्थ्यांच्या भवितव्यांचं काय?