मुंबई : इर्शाळवाडीच्या दुर्घटनेला आज दहा दिवस पूर्ण झाले. या घटनेत 29 जणांचा मृत्यू तर 57 बेपत्ताना मृत घोषित करण्यात आले होते. या घटनेत बेघर झालेल्याना मदतीचे काम सुरू आहे. दरम्यान आज मृतांच्या नातेवाईंकाकडून साश्रृ नयनांनी दशविधी क्रिया करण्यात आली. यावेळी मृतकांच्या नातेवाईकांसह प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही डोळे पानावले होते.
इर्शाळवाडी घटनेला आज दहा दिवस पूर्ण झाले. या घटनेतील मृतकांच्या नातलगांकडून घटनास्थळीच दशविधी क्रिया करण्यात आली. मृत पावलेल्यांचा दशविधी क्रिया विधी परंपरेप्रमाणे सार्वजनिकरित्या करण्याच्या उद्देशाने सर्व तयारी करण्यात आली होती. यासाठी लागणारे साहित्य, मृत व्यक्तींचे फोटो फ्रेम, विधीसाठी जंगम व्यवस्था प्रशासनाने केली. यावेळी मुंडण करण्यासाठी नाभिक समाजाची मदत, वाहतुकीसाठी वाहने, विधीनंतर भोजन इत्यादी व्यवस्था करतांना आपल्याच नात्यातल्या कोणाचा विधी असल्याप्रमाणे प्रशासनातले अधिकारी-कर्मचारी झटताना दिसून आले.
कॉलनी उभारण्याचे काम सुरू
इर्शाळवाडीच्या दुर्घटनेला बघता बघता उद्या दहा दिवस झाले आहेत. या घटनेत बेघर झाल्यानंतर जे. एम.म्हात्रे यांच्या चॅरिटेबल संस्थेच्या पंचायतन मंदिरात आधी काही दिवस आदिवासी बांधवांना निवारा मिळाला होता. त्यानंतर चौक येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या कॉलनीमध्ये सर्वांना आणले गेले. त्या कॉलनीची उभारणी करताना रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन, पीडब्ल्यूडी विभाग, पोलीस प्रशासन आणि इतर सरकारी यंत्रणांनी अनेक सामाजिक संस्थाना सोबत घेऊन विक्रमी वेळात योग्य सोयी आणि सुविधा निर्माण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.
विदारक क्षण कधीच विसरता येणार नाहीत
इर्शाळवाडी दुर्घटनेत बेघर झालेल्यांना पुढील काही दिवसांत निवारा मिळणार आहे. त्यासाठी कॉलनीचे काम सुरू आहे.त्या ठिकाणी ते सर्व आदिवासी बांधव दुःखातून सावरून हळूहळू पूर्वपदावर येतीलही. कदाचित काळाच्या आड सगळं विस्मृतीत निघून जाईल मात्र ज्यांनी हे प्रत्यक्ष अनुभवले आहे त्यांच्या मनपटलावरून ते विदारक क्षण कधीच पुसले जाणार नाहीत.