मुंबईः खारघर दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. adv शैला जितेंद्र कंठे यांनी adv नितीन सातपुते यांच्या मार्फत ही याचिका केली आहे.
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री, आरोग्यमंत्री, नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी आणि विशेष महानगर दंडाधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त, यांच्यासह १७ जणांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आली आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी हे १२ व्या क्रमांकावर प्रतिवादी आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर केला. हा पुरस्कार प्रदान सोहळा खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. आप्पासाहेब धर्माधिकार यांना हा पुरस्कार देण्यात आला. भरदुपारी हा पुरस्कार सोहळा झाला. या घटनेत १४ जणांचा उष्माघाताने बळी गेला. उष्माघाताचा त्रास झालेल्या काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावरून राजकारण चांगलेच तापले. विरोधकांनी या घटनेप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार, उद्धव ठाकरे यांनी उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेतली.
याचिकेतील मागण्या
हत्येचा गुन्हा नोंदवा. यासह अन्य गुन्ह्याची नोंद करावी.
सीबीआयकडे हा तपास वर्ग करावा. पोलीस महासंचालकांनी या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तिंवार कारवाई न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून पुरस्काराचे २५ लाख रुपये परत घ्यावे आणि सरकारी तिजोरीत जमा करावेत. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह १२ प्रतिवादींकडून १४ कोटी रुपये वसुल करावे.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि डॉ. धर्माधिकारी यांची मालमत्ता जप्त करावी. पीडितांच्य कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी.
मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये, जखमींना ५ लाख रुपये मदत द्यावी. तत्काळ काही तरी मदत द्यावी.