राज्यात ऊर्जा विभागाने सुरू केलेले लोडशेडींग हा म्हणजे दोन मंत्र्यांच्या लढाईत जनतेला फसवण्याचा हा धंदा आहे. वीज खरेदीत घोटाळा करण्यासाठी एकीकडे लोडशेडींग दाखवत महागडी वीज खरेदी करून भ्रष्टाचार करायचा हा उद्योग आहे. वित्त मंत्र्यांकडे एकीकडे १८ हजार कोटी रूपये आहेत. जाणीवपूर्वक केलेले हे लोडशेडींग आहे. प्रत्यक्षात सरकारी कंपन्यांचे वीजसंच बंद ठेवत महागडी वीज खरेदी करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कुठे किती लोडशेडींग ?’
राज्य सरकारच्या अखत्यारीतील वीज कंपन्यांनी विजेचे योग्य व्यवस्थापन न केल्यानेच राज्यात भार नियमनाची वेळ आली आहे. राज्यात सध्या २५०० मेगावॉटचे असे अघोषित लोडशेडींग आहे. तर दीड हजारांचे अघोषित लोडशेडींग आहे. राज्यात एकुण ४ हजार मेगावॉटचे लोडशेडींग सध्या सुरू आहे. आदिवासी, नक्षल भागातही लोडशेडींग आहे. सध्या शेतकऱ्यांना २ तासच वीज मिळते आहे. केंद्राच्या नावाने खोट बोलून हे सरकार जाणीवपूर्वक सरकारला फसवत आहे.
राज्यातील सरकारने वेळीच कोळसा व्यवस्थापन केले असते तर हे संकट टाळता आले असते असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. केंद्राने २२ दिवसाचा कोळसा उचला हे जानेवारी ते मार्च कालावधीत राज्य सरकारला सांगितले होते. तसेच रेल्वेही वॅगॉन्स द्यायला तयार झाली होती. पण वीज कंपन्यांकडे कोळसा खरेदीसाठी पैसे नसल्याने त्यांनी हा कोळसा उचलला नाही. २ हजार कोटींची थकबाकी असतानाही, केंद्राने कोळसा उचला असे सांगूनही कोळसा घेण्यात आला नाही. राज्य सरकारच्या वित्त विभागाने वीज कंपन्यांचे १८ हजार कोटी रूपये थकवले आहेत. त्यामुळेच ही आर्थिक अडचण निर्माण झाल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील किती क्षमतेचे वीजनिर्मिती संच बंद ?
राज्यातील वीज कंपन्यांचे पॉवर स्टेशन बंद पडले आहेत. हे बंद पडलेल्या वीज कंपन्यांचे पॉवर स्टेशन जरी सुरू झाले तरीही राज्यात एका तासात भारनियमन मागे घेता येणे शक्य आहे. सध्या राज्यात ७ पॉवर स्टेशन बंद पडलेले आहेत. एकुण २३०० मेगावॉट क्षमतेचे संच बंद पडलेले आहेत. पण हे संच बंद पडण्याचे कारण अतिशय किरकोळ आहे. त्यामुळे हे संच कार्यान्वयित करणे काही उपाययोजना केल्यास तत्काळ शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. कोराडी ७ हा संच काही कारणाने बंद आहे. तसेच खासगी संचात जेएसडब्ल्यू, साई वर्धा हा संच बंद आहे. कोराडी १०, नाशिक ४, घाटघरचा संच बंद आहे. तसेच उरणचा संच हा गॅस कमी असल्याने बंद आहे. तर खापरखेडा संच हा ट्रान्सफॉर्मर फेल झाल्याने बंद आहे.