मुंबई : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे उपोषण सुरू केले होते. राज्य सरकारतर्फे शिष्टमंडळाने गुरुवारी भेट घेतल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. या अनुषंगाने सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने टिप्पणी करताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा – Maratha Reservation : जरांगेंनी आता दिल्लीला धडक दिली पाहिजे, ठाकरे गटाचा सल्ला
जरांगे-पाटलांनी आता उपोषण मागे घेतले. पण त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. राज्यातील बेकायदा सरकारने ज्या पद्धतीने हा प्रश्न चिघळवत नेला त्यातून हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
- शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मिंधे सरकार नेहमीच म्हणत आले की, आमच्या मागे महाशक्ती आहे. ही महाशक्ती महाराष्ट्र पेटला असताना झोपली होती काय?
- देवेंद्र फडणवीस निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीस गेले. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा होते. फडणवीस यांनी जरांगे-पाटलांचे उपोषण व महाराष्ट्राच्या स्थितीवर पंतप्रधानांशी चर्चा केली काय?
- भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेला चूड लावायची आहे काय? मराठा समाज विरुद्ध ‘ओबीसी’ असा झगडा त्यांना पेटवायचा आहे काय?
- सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीस म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा. सगळे ठीक होईल.’’ याचा अर्थ काय? मराठा आरक्षणापासून फडणवीस स्वतःला लांब का ठेवत आहेत?
- मनोज जरांगे-पाटील हा फाटका फकीर माणूस असून त्याच्या रक्तात स्वार्थ नाही. त्यामुळे दबाव आणि खोक्यांनी तो विकत घेता येणार नाही. हीच सरकारची समस्या आहे काय?
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावून घटनादुरुस्ती करणे गरजेचे आहे. विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्यापि का केली नाही? व आता तरी ते विशेष अधिवेशन घेतील काय?
- मनोज जरांगे-पाटील यांना दिल्लीत नेऊन पंतप्रधानांशी चर्चा का घडवली गेली नाही?
- गुजरातमधील ‘पटेल’ आंदोलनाप्रमाणे महाराष्ट्रातील ‘मराठा’ आंदोलन चिरडून टाकायची योजना आहे काय?
- शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर वर्षभर लांबवले, तसे मराठ्यांचे आंदोलन सरकारला लांबवत ठेवायचे राजकारण आहे काय?
- सरकारला जरांगे-पाटलांचे नेतृत्त्व संपवून त्यांचा अण्णा हजारे करायचा आहे काय?
हेही वाचा – 2 जानेवारी नव्हे 24 डिसेंबरच; तारखांमधील गोंधळावर जरांगेंची प्रतिक्रिया म्हणाले, आरक्षण…
या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला हवी आहेत. थातूरमातूर बैठका व चर्चा यातून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार नाही, असे ठाकरे गटाने या अग्रलेखात म्हटले आहे.