विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन मंगळवारी संपलं. दोन दिवसांचं अधिवेशन अनेक मुद्द्यांवरुन गाजलं. सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद, प्रतिवाद झालेले पाहायला मिळालं. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी प्रतिविधानसभा सुरु केली. संपूर्ण प्रकरणावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. विधानसभा, प्रतिविधानसभा ही नाटकं संपली असतील तर जरा जनतेचा विचार करा, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी “वाद, प्रतिवाद, टोला, प्रतिटोला, विधानसभा, प्रतिविधानसभा ही नाटकं संपली असतील तर जरा जनतेचा विचार करा. टाळेबंदीमुळे जनता पिचली आहे. लोकल प्रवासाची मुभा द्यावी. मास्क लावून जनतेचं तोंड कायमच बंद करता येणार नाही,” असं संदीप देशपांडे म्हणाले.
वाद,प्रतिवाद,टोला, प्रतिटोला, विधानसभा, प्रतिविधानसभा ही नाटक संपली असतील तर जरा जनतेचा विचार करा.टाळेबंदी मुळे जनता पिचली आहे लोकल प्रवासाची मुभा द्यावी. मास्क लावून जनतेचं तोंड कायमच बंद करता येणार नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 7, 2021
विधीमंडळ परिसरात भाजपने भरवली प्रतिविधानसभा
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्यानं भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. सभागृहाचे कामकाज सुरु होण्याआधी भाजपनं विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं होतं. त्यानंतर सभागृहाबाहेरच भाजपने भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना अध्यक्षपदी बसवत प्रतिविधानसभा भरवत सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.