घरमनोरंजनDilip Kumar Death: ...आणि दिलीप कुमार मधुबाला यांची प्रेम कहाणी अधूरी राहीली

Dilip Kumar Death: …आणि दिलीप कुमार मधुबाला यांची प्रेम कहाणी अधूरी राहीली

Subscribe

ट्रॅजडी किंग असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. दिलीपकुमार यांचा चित्रपट प्रवास जेवढा अफाट होता तेवढंच त्यांच खासगी आयुष्यही चढ उतारांनी भरलेले होतं. याप्रवासात पत्नी सायरा बानो सतत त्यांच्यामागे सावलीसारख्या उभ्या होत्या. पण एकेकाळी दिलीप कुमार आणि मधुबाला यांच एकमेकांवर अपार प्रेम होतं. मुगल ए आझम मध्ये यां दोघांचं नातं खऱ्या अर्थाने बहरलं. मात्र तब्बल नऊ वर्षानंतर हे नातं तुटलं आणि दिलीप कुमार यांना नैराश्य आलं.

त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटाच्या ऑफर्सही सोडल्या. तर मधुबालालाही हा धक्का पचवता आला नाही. दोघांचीही अवस्था सारखीच होती. पण नंतर काळाच्या ओघात दोघजणं आपआपल्या कामात बिझी झाले. पण एकमेकांना गमावल्याची सल दोघांना होती. मधुबालाची बहीण मधुर ब्रिज भूषण हीने एका मुलाखतीत या दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितलं होतं. या दोघांमधली बॉंडींग अनेकवेळा चित्रपटातही दिसायची. त्यामुळे दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या सीनचे रिटेक जवळ जवळ होतंच नसतं. दोघंही समरसून भूमिका करायचे. त्या पात्रांमध्ये ते एकमेकांना बघायचे. त्यांच्यातली ही जवळीक सगळ्यांच्या नजरेत यायची. पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दिलीप कुमार आणि मधुबालाला जगाची पर्वा नव्हती.

- Advertisement -

या दोघांची पहीली भेट झाली ती ‘तराना’ या चित्रपटाच्या सेटवर. मधुबालाला पहील्याच भेटीत दिलीप कुमार यांनी आपलसं केलं. त्यानंतर मधुबाला शूटींग करत असलेल्या सेटवर दिलीप कुमार यायचे. नंतर दोघेही कारमध्ये बसून निघून जायचे. मधुबालाला फिरायला आवडायचं. यामुळे अनेकवेळा शूटींग सोडून ते दोघे बाहेर जायचे. दोघेही एकमेकांसोबत खुश होते लवकरच त्यांनी साखरपुडाही केला. दिलीप कुमार यांनी मधुबालासाठी नवीन घरही बुक केलं होतं. त्याच घरातून संसाराची सुरूवात करण्याचा त्यांच स्वप्न होत.

पण अचानक दोघांमध्ये बिनसायला लागलं. दिलीप कुमार मधुबालाच्या बाबतीत पझेसिव्ह होते. एकदा जबीन जलाल चित्रपटाच्या शुटींगदरम्यान एकाने सेटवरील महिलेबरोबर गैरवर्तन केले. याबद्दल मधुबालाच्या वडिलांना कळताच त्यांनी अशा लोकांबरोबर काम न करण्याचा सल्ला मधुबालाला दिला व तिला चित्रपटात काम करण्यास मनाई केली. मधुबालाने व दिलीप कुमार यांनी वडिलांच्या खूप विनवण्या केल्या. शेवटी शूटींगचे लोकेशन बदला तरच माझी मुलगी चित्रपटात काम करेल अशी अट मधुबालाच्या वडिलांनी निर्मात्याला घातली. ही गोष्ट दिलीप कुमार यांना आवडली नाही. त्यावरून त्यांनी मधुबालाच्या वडिलांना सुनावले. तसेच ते हुकुमशाह आहेत का असेही दिलीप कुमार म्हणाले.

- Advertisement -

आपल्या वडिलांचा दिलीप कुमार यांनी केलेला अपमान मधुबालाला सहन झाला नाही. त्यावरून दिलीपकुमार व मधुबाला यांच्यात वाद झाला. तर दुसरीकडे दिलीप कुमार यांनी अपमान केल्याने मधुबालाचे वडिलही चिडले होते व त्यांनी दिलीप कुमारबोरबरच सगळे संबंध तोड असा हुकुमच मधुबालाला दिला. या दोघांच्या वादात मधुबाला फसली होती. ती दोघांची समजूत काढत होती. अखेर दिलीप कुमार यांनी मधुबालाला सांगितले की आपण निकाह करूया . पण तू त्यानंतर कधीही वडिलांशी संबंध ठेवणार नाही. मधुबाला तयारही झाली. पण निकाहानंतर तू माझ्या वडिलांची माफी माग. मग सगळं ठीक होईल. असं तिने दिलीप कुमार यांना सांगितले. पण दिलीप कुमार यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणे सोडले. दोघेही अटींवर अडून बसले. अखेर नऊ वर्ष प्रेमात रमणार हे सुंदर जोडपं कायमचे एकमेकांपासून दुरावले.


 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -