‘मोदी सरकार या पाच वर्षात नोकरी आणि महागाई सारख्या मुद्द्यावर काहीही करू शकलस नाही, हे आज पंतप्रधान मोदी यांच्या मुंबईतील सभेतून निष्पन्न झाले आहे. हे विषय सोडून भावनात्मक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात मोदींनी भर दिला आहे. यातूनच सर्व चित्र स्पष्ट होत’ असल्याचं मत मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी परखडपणे मांडलं आहे.
पोलिसांचा अपमान करणाऱ्यांना मोदी देतात साथ
मुंबईकरांनी पंतप्रधान मोदींना स्पष्टपणे विचारायला हवं की आपल्या सेना आणि पोलिसांचा अपमान होईल अशा उमेदवारांना ते साथ का देत आहेत? पंतप्रधान जर खरंच महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान करत असतील तर त्यांनी साध्वी प्रज्ञा ठाकुरला दिलेली उमेदवारी त्वरीत रद्द करायला हवी. शहीद हेमंत करकरेंच्या सन्माणार्थ हे पाऊल पंतप्रधान म्हणून ते नक्कीच उचलू शकतात.
यानंतर मिलिंद देवरा यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, ‘भाजपा आणि शिवसेना ही महायुती नाही ही तर सहयुती आहे. इतकं सगळं घडत असताना शिवसेना गप्प का आहे?, असा सवालदेखील यावेळी त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र राज्याच्या शाहिदाचा अपमान झाल्यानंतरही शिवसेना मूग गिळून गप्प बसली आहे. अशा प्रकारे राजकारण खेळणाऱ्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना मुंबईची जनता नक्कीच माफ करणार नाही, अशीही पुष्टी त्यांनी जोडली. ही बाब अतिशय दुर्भाग्यपूर्ण असून विचार करण्याजोगी आहे.
महायुती नाही ही तर सहयुती
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात कुठेही शिवसेनेचा उल्लेखदेखील केला नाही. हे कसं गठबंधन आहे नक्की? निवडणुकांपूर्वी शिवसेना पंतप्रधानांच्या विरोधात बोलत होती आणि आता त्यांच्या बाजूने बोलत आहे. मत मागताना आता मोदीच्या नावाने मत मागणं सुरू आहे. महायुती नाही ही तर सहयुती आहे, असा टोला त्यांनी लगावला. इतकंच नाही तर पुढील सहा महिन्यात हे एकत्र न राहता हे बंधन तुटून जाईल, असंही मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.