घरमहाराष्ट्रमुंबईचा इतिहास कायम!

मुंबईचा इतिहास कायम!

Subscribe

चक्रीवादळ आले आणि निघूनही गेले, दिवसभरात १९६ झाडे पडली, ३९ शॉर्टसर्किटचे प्रकार, रत्नागिरीत चार जण जखमी, आजपासून होणार पंचनामे,

निसर्ग चक्रीवादळापासून मुंबईला मोठा धोका असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, मुंबईच्या आतापर्यंतच्या इतिहासाप्रमाणे हे निसर्ग चक्रीवादळ मुंबईला स्वत:चे फक्त अस्तिव दाखवत कोणतीही मोठी हानी न करता पुढे निघून गेले. हे चक्रीवादळ आणि त्यामुळे आलेल्या पावसाने मुंबईत १९६ झाडे, ९ भिंती पडण्याच्या घटना घडल्या. तसेच ३९ ठिकाणी शॉर्टसर्किटही झाले. मात्र सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आलेले हे चक्रीवादळ तसेच उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने निघून गेले. मुंबईत संध्याकाळपर्यंत शहरात ४६.७ मि.मी. तर उपनगरांमध्ये २२.४ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. मात्र पुढील २४ तासांमध्ये मुंबई शहर व उपनगरांमध्ये वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वादळी वार्‍यामुळे १९६ झाडांची पडझड
मुंबईत बुधवारी पहाटेपासून मुंबईत वादळी वार्‍यामुळे झाडे तसेच त्यांच्या फांद्या तुटून पडण्याच्या ५७ घटना शहर व उपनगरांमध्ये घडल्या आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत झाडांच्या फांद्या किंवा वृक्ष उन्मळून पडण्याच्या २५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. परंतु संध्याकाळपर्यंत एकूण ३९ झाडे शहरात पडली होती. तर पूर्व उपनगरांमध्ये संध्याकाळपर्यंत ४० आणि पश्चिम उपनगरांमध्ये ३८ झाडांची पडझड झाली होती. त्यामुळे शहर व उपनगरांमध्ये एकूण १९८ झाडांची पडझड झाली होती. परंतु यामध्ये कुणालाही मार लागला नसून कुठल्याही मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.

- Advertisement -

मुंबईत ९ ठिकाणी घर, प्लास्टर पडण्याच्या दुर्घटना
मुंबईत वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे शहरात ३, पश्चिम उपनगरात ४ आणि पूर्व उपनगरात २ अशा एकूण ९ ठिकाणी घराचा तसेच भिंतीचा प्लास्टरचा भाग पडण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. मात्र, यामध्ये कुणालाही मार लागलेला नाही.

मुंबईत ३९ ठिकाणी शॉर्टसर्किटचे प्रकार
वादळीवारे आणि पाऊस यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या असून दिवसभरात अशाप्रकारच्या ३९ घटनांच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये शहरात १९ आणि उपनगरांत २० घटनांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये कुणीही जखमी झालेले नाही.

- Advertisement -

५ हजार डोळ्यांनी मुंबईवर नजर
महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्ष फक्त चक्रीवादळसंदर्भातील व्यवस्थापन करण्याकरिता स्थापन करण्यात आला. याठिकाणी सर्व यंत्रणा म्हणजेच पोलीस, अग्निशमन दल, बेस्ट, उद्यान विभाग, जनसंपर्क विभाग यांचे प्रतिनिधी समन्वयासाठी उपस्थित होते. याव्यतिरिक्त नियंत्रण कक्षात असलेल्या ५ हजारांपेक्षा अधिक कॅमेर्‍यांच्या माध्यमातून घडामोडींवर नजर ठेवून होते. या नियंत्रण कक्षात सकाळी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी व इतर अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व संजीव जयस्वाल हे नियंत्रण कक्षात बसून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यावेळी आपत्कालिन विभागाचे सल्लागार महेश नार्वेकर, सहआयुक्त मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.

सुमारे १९ हजार नागरिकांचे स्थलांतर
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगरांमध्ये विविध ठिकाणी ३५ ठिकाणी तात्पुरती निवारे म्हणून महापालिकेच्या शाळा खुल्या करून देण्यात आल्या होत्या. सायंकाळपर्यंत समुद्र किनार्‍यालगतच्या वस्त्यांमध्ये राहणार्‍या १८ हजार ८८७ नागरिकांना या तात्पुरत्या निवार्‍यांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यांच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. नागरिकांनी स्थलांतर करावे म्हणून जागोजागी आवाहन करण्यात येत होते. स्थलांतरीत नागरिकांसाठी निवार्‍यासह जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. मिठी नदीसह दरड कोसळण्याच्या ठिकाणांवरील डोंगराळ भागातील लोकांनाही स्थलांतरीत करण्यात आले होते.

आरोग्य तपासणी करून स्थलांतरितांना घरी पाठवणार
चक्रीवादळ ओसरल्यानंतर घरी परतण्यापूर्वी या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे देखील निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या सर्वांची आरोग्य तपासणी करूनच त्यांना घरी पाठवण्याचे नियोजन महापालिकेच्या विभाग कार्यालयातील अधिकार्‍यांनी केले आहे. ज्या नागरिकांमध्ये करोनाबाधित असल्याची साधारण लक्षणे आढळून येतील अशा नागरिकांना सीसीसी-२ मध्ये पाठवण्यात येईल. तर ज्या नागरिकांमध्ये कोणतीही लक्षणे नाही अशांना वैद्यकीय तपासणीनंतरच गुरुवारी घरी जाऊ दिले जाईल,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वांद्य्रातील २१२ रुग्ण वरळीतील एनआयसीआयमध्ये स्थलांतरीत
वांद्रे-कुर्ला संकुल येथे एमएमआरडीए मैदानावर उभारलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्र या जम्बो फॅसिलिटीमध्ये असलेल्या २१२ रुग्णांना वरळी येथील एनएससीआय कोविड जम्बो फॅसिलिटीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. बीकेसीतील कोविड केंद्र हे सुमारे १०५ किमी प्रतितास वेगाच्या वार्‍याचा सामना करू शकते. मात्र चक्रीवादळात १२० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज असल्याने हा धोका लक्षात घेता या रुग्णांना वरळी येथे स्थलांतरित केले आहे, अशी माहितीदेखील आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

आयुक्त ऑन फिल्ड
चक्रीवादळासंदर्भात नियंत्रण कक्षात जाऊन आढावा घेतल्यानंतर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी खान अब्दुल गफार खान मार्गावरील वरळी सी फेस परिसराची पाहणी केली. त्यानंतर बेझंट मार्गावरील पंम्पिंग स्टेशन येथील नाल्याची व लगतच्या परिसराची पाहणी केली. या ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी बीकेसी मेट्रो रेल्वे लगत महापालिकेने उभारलेल्या फ्लड गेटच्या कामाची पाहणी केली. संततधार पावसात होत असलेल्या या पाहणी दौर्‍याला महापालिका आयुक्तांसह भेट अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारसू, संबंधित सहायक आयुक्त, महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निसर्ग चक्रीवादळाचे रायगड, पुण्यात बळी

निसर्ग चक्रीवादळाने राज्यात दोन जणांचा बळी घेतला. निसर्ग चक्रीवादळाचा पहिला बळी अलिबाग मध्ये गेला आहे. अलिबाग मधल्या उमटे गावातल्या 58 वर्षांच्या दशरथ वाघमारे यांच्यावर वीजेचा खांब पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. जोराच्या वार्‍यांमुळे वाघमारे यांच्यावर वीजेचा खांब कोसळला आणि त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयत नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरा मृत्यू पुणे जिल्ह्यात झाला. वाहागव,तालुका खेड या भागातील गावात तानाजी अनंता नवले व नारायण अनंता नवले यांचे घर आजच्या वादळात उडाल्याने त्यांचे आई मंजाबाई अनंता नवले वय 65 यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरातील 5 माणसे जखमी झाली आहेत. यामध्ये नारायण नवले वय 45 यांना चाकणमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तानाजी अंनाता नवले व घरातील इतर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -