नाशिक : जिल्ह्यातील रस्ते चोरीला गेल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला प्राप्त होत होत्या. इगतपुरी तालुक्यातील कुर्हेगाव येथील सरपंचांनी त्यांच्या गावातील रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी नेमलेल्या पथकाने तपास करत तक्रारीत तथ्य नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
जि. प. सीईओ मित्तल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित तक्रारदार सरपंचांविरोधात जिल्हा परिषदेची बदनामी केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले आहेत. यादृष्टीने कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत अशा खोट्या तक्रारी करण्यार्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगातून बांधलेले रस्ते चोरीला जात असल्याची प्रकरणे वारंवार समोर येत होती. गेल्या महिन्यात मालेगाव तालुक्यातील टोकडे येथे रस्त्याची चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्याचा तपास पूर्ण करून अहवाल प्राप्त झाला.त्यानंतर लगेचच इगतपुरी तालुक्यातील कुर्हेगाव येथील सरपंचांनीच रस्ता चोरीस गेल्याची तक्रार केली होती.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी याबाबत पथक नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कार्यकारी अभियंता संदिप सोनवणे यांनी पेठ उपअभियंता भडांगे, शाखा अभियंता मोरे आणि सहाणे यांचे पथक नेमले. पथकाने जागेवर तक्रारदाराला समोर पाहणी केली. या पाहणीमध्ये तक्रारदाराच्या तक्रारीनुसार पथकाने रस्ता खोदून तपासणी केली. तक्रारदार सरपंच यांना रस्ता दाखवत त्यांच्या तक्रारीचे निरसन केले. उपसरपंचांनी रस्ता झाला असल्याचे लेखी दिले. त्यानंतर रस्ता चोरीला गेला नसल्याचा अहवाल सादर केला. अहवालानुसार, जिल्हा परिषदेची बदनामी करण्याच्या हेतूने कुर्हेगावच्या सरपंच संगीता धोंगडे व पदाधिकारी भाऊसाहेब धोंगडे यांनी तक्रार केली असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समजते.