टाकेद : राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील सरपंच शिवाजी गाढवे, पांडुरंग गाढवे, निवृत्ती जाधव, सुनिल गाढवे यांनी रविवारी राहुरी येथील वरशिंदे गावात वीज मंडळाच्या इगतपुरी तालुक्यातील ७ ते ८ ग्रामपंचायततीचे ठराव असलेल्या समस्यांबाबत भेट घेऊन निवेदन दिले.शेतकर्यांनी इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. येथे धरणे भरलेले असतानासुद्धा हक्काच्या पाण्याचा आम्हाला उपयोग होत नाही, कारण वीज पुरवठा सुरळीत नाही, पावसाळ्यात आमच्या भात शेतीमुळे चार महिने वीज पंप बंद असतात. त्यामुळे आम्हाला हंगामी वीजबिल आकारणी करावी, ३३ केव्ही धामणगाव साकुर, ता. ईगतपुरी सब स्टेशन अंतर्गत शेतकर्यांना वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे अडचणी येतात.
शासनाने जाहीर केलेल्या लोडशेडिंगच्या व्यतिरिक्त अतिरिक्त लोडशेडिंग केले जाते. तसेच शेतात अनेक विजेच्या तारा लोंबकळलेल्या अवस्थेत असून ऊस शेतीचे शॉक सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.सध्याच्या परिस्थितीत शासनाच्या वीजबिल वसुलीमुळे परिसरातील ट्रान्सफार्मर बंद केल्यामुळे भाजीपाला पीक वाया गेल्याशिवाय राहणार नाही. खापराळे सिन्नर ते साकुर येणारी ३३ केव्ही नवीन लाईन लवकरात लवकर सुरू करावी. यावेळेस राज्यमंत्री यांनी त्वरित नाशिक विभागाचे एक्झिक्युटिव्ह डोंगरे यांच्याशी संपर्क साधून चालू बिलासंदर्भात व
विविध विषयांवर चर्चा केली.
वीज बिलाच्या संदर्भातील प्रश्न गंभीर असून शेतकर्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असून इथून पुढे निवेदनातील ज्या महत्त्वाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी थोड्याच दिवसात मंत्रालयात आमदार माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, संबंधित अधिकारी व शेतकर्यांच्या समवेत बैठक आयोजित करू.
–प्राजक्त तनपुरे, ऊर्जा राज्यमंत्री