पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षितरित्या प्रगती करत असल्यामुळे विरोधक बिथरले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना कोठे काय बोलावे हेच सूचत नसून, त्यांना हिंदुत्ववादीची काळजी वाटू लागली आहे. हिंदू ग्रंथ वाचल्याचे राहुल सांगतात, पण ज्यांनी देशात जातीय दंगली घडवल्या त्यांनी आपला खरा धर्म सांगावा, असे खुले आव्हान खासदार संजय राऊत यांनी येथे दिले.
भाजप, सेना महायुतीच्या मेळाव्यानिमित्त नाशिकमध्ये ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. राऊत म्हणाले की, मोदींना पराभूत करण्यासाठी देशातील ५० पक्ष एकत्र आले आहेत. तसे झाले तर भारताचे तुकडे होतील, असा आरोप त्यांनी केला. राहूल गांधींनी नाशिकसारख्या युतीच्या बालेकिल्ल्यात येऊन दाखवावे. पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा मोदी असतील, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न जाहीर करतील, असा विश्वासदेखील त्यांनी बोलून दाखवला.