पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी घेण्यासाठी जाताना अपघात झाल्याने टँकरखाली दबून मेशी येथील तरुण शेतकर्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. जुलै उजाडूनही समाधानकारक पाऊस न झाल्यानेच तरुणाचा बळी गेला.
शनिवार (१३ जुलै) पहाटे ६ वाजता पिण्यासाठी व जनावरांसाठी टँकर भरण्यासाठी येथील युवक सोपान तुळशीराम चव्हाण (वय ३१) हा मेशीहून महालपाटणे येथे जात होता. गिरणा उजव्या कालव्याच्या पुलाजवळ टँकर पलटी झाला. यावेळी टँकर चालक सोपान चव्हाण हा टँकरखाली दाबला गेला होता. स्थानिक ग्रामस्थ व तरुणांनी तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने टँकर सरळ करत सोपानला बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मेशी आणि परिसरात वेळेवर पाऊस झाला असता तर कदाचित सोपान हा टँकर भरण्यासाठी गेला नसता आणि सोपानवर ही वेळ आज आली नसती. सोपान हा दुष्काळाचा पहिला बळी ठरला आहे, अशी मेशीत चर्चा आहे. त्याच्यामागे आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा व मुलगी, असा परिवार आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक लहाणू धोकरट व विनायक गायकवाड हे करत आहेत.