पुणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरायला लावणाऱ्या महापालिकेने गुरुवारी रात्री मध्यरात्रीपासून रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया घालविल्याचा प्रकार समोर आला आहे. विमाननगर भागात व्हॉल्व फुटल्याने रात्री ११.३० पासून सकाळपर्यंत धोधो पाणी वाहत होते. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाण्याचे उंच कारंजे उडत होते. गुरूवारी रात्री साडेअकरा वाजल्यापासून पाणी वाहत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली मात्र ही बाब आज सकाळी सात वाजता पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना समजली. तक्रार देऊनही तातडीने कारवाई न झाल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. सकाळी पाण्याची गळती रोखली असून दुरूस्तीचे काम सुरू आहे.
संपुर्ण शहरात पाणीकपातीचे संकट असताना अशा प्रकारे पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. याप्रकरणी जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. विमाननगर दत्त मंदिर चौकात हाकेच्या अंतरावर स्थानिक नगरसेविका व नगरसेवक राहतात. शिवाय उपमहापौरांचे निवासस्थान देखील विमाननगर प्रभागातच आहे. तर नगररोडच्या लागलीच पलिकडे आमदारांचे निवासस्थान आहे. एवढे माननीय असणाऱ्या विमाननगर प्रभागात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो याबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.