मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच आता कोकणाकडे जाणारी रेल्वेवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नागोठणे आणि रोह्यादरम्यान ट्रॅकवरच दरड कोसळल्यामुळे सकाळी साडेअकरा पासून कोकणकडे जाणारी वाहतूक बंद धाली आहे. मध्य रेल्वेने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. तसेच, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
Update of trains towards Konkan at 11.30 am
Mud and land slide between Nagothane and Roha due to heavy rains. Up line available for traffic. Our team working to clear the Dn line as early as possible.— Central Railway (@Central_Railway) September 4, 2019
दरम्यान, कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प असली, तरी कोकणातून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक मात्र सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळाला आहे. सध्या रोहा आणि नागोठण्यादरम्यान कोसळलेली दरड काढण्याचं काम सुरू असून लवकरच रेल्वे ट्रॅक मोकळा करण्यात येईल असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या कामाला नक्की किती वेळ लागेल, हे मात्र सांगता येत नसल्यामुळे ऐन गणपतीत कोकणात जाण्याच्या तयारीत असलेल्या चाकरमान्यांची पंचाईत झाली आहे.
हेही वाचा – मुसळधार पावसामुळे मुंबईतील महापालिका शाळांना सुट्टी
मुंबईत आणि ठाणे-कल्याण आदी उपनगरांमध्ये मंगळवारी रात्रीपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. लोकलच्या तिन्ही मार्गांवरची वाहतूक सध्या विस्कळीत आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प झाली असून पश्चिम रेल्वेवरची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.