मशिदींवरील भोंगे हटवा अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात घेतली. त्यांच्या या भमिकेवरुन पक्षात नाराजी आहे. त्यामुळे पक्षाला याचा फटका बसतोय. दरम्यान, मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. इरफान शेख यांनी गुरुवारी सांगितले की, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याच्या त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आपण पक्ष सोडला आहे.
राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात शेख म्हणाले की, मी जड अंत:करणाने पक्षाचा राजीनामा देत आहे. शेख यांनी हे पत्र फेसबुक पोस्टद्वारे शेअर केले आहे. शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ज्या पक्षासाठी तुम्ही काम केले आणि सर्वस्व मानले, तोच पक्ष त्या समाजाच्या विरोधात द्वेषपूर्ण भूमिका घेतल्यास आता ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची वेळ आली आहे.”
ते म्हणाले की, मनसेची स्थापना झाली तेव्हा जातीविरहित राजकारण करण्याचा विचार होता. शेख म्हणाले, “राजसाहेब ठाकरे हे आशेचा किरण होते. पण गुढीपाडव्याच्या मेळाव्यात काहीतरी वेगळं बघायला आणि ऐकायला मिळालं.” मनसेला द्वेषाचे राजकारण करणाऱ्या शक्तींचा पाठपुरावा करण्याची गरज का भासली? असा सवाल त्यांनी पक्षाला केला.
पत्रात शेख म्हणाले की, ठाकरे यांना १६ वर्षांनंतर अजान आणि मशिदींबाबत शंका आहे. ठाकरे सोबत असताना आपण या विषयावर का बोललो नाही, असा सवालही शेख यांनी केला. सर, तुमची चूक नसेल. पण काहीतरी गंभीर घडणार आहे, असं वाटतंय. कृपया मी दिलेला राजीनामा स्वीकारा, असे इरफान शेख यांनी पत्रात म्हटले.
दरम्यान, मुंबई आणि मराठवाडा भागातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांनी सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.