रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीमध्ये निर्णय घेतल्यानंतर प्रादेशिक नळपाणी योजनांची थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना १० डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. थकीत रकमेच्या पन्नास टक्के रक्कम या मुदतीत भरावयाचे आहेत. अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात आठ प्रादेशिक योजना
जिल्ह्यात आठ प्रादेशिक योजनांमधील बाणकोट ५ लाख ८० हजार, पालगड २१ लाख ५० हजार, उधळेआपडे १ लाख २३ हजार, नांदिवसे १३ लाख ४६ हजार, मांडकी १६ लाख ५२ हजार, संगमेश्वर १ कोटी १८ लाख ५४ हजार, जयगड १ कोटी ८५ लाख ४४ हजार, साखरीनाटे १४ लाख ४५ हजार रुपयांची थकबाकी आहे. या योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून लाखो रुपये खर्च होतात. या योजनांवर ४० ग्रामपंचायतींमधील ६४ गावे आणि ३६४ वाड्यांचा समावेश आहे. या गावाची लोकसंख्या ६३ हजार ९४५ असून १० हजार २८९ कुटुंबे आहेत. यामध्ये ५,५३९ कुटुंबांकडे खासगी, तर १,४७७ जोडण्या सार्वजनिक स्टँडपोस्ट आहेत.
ग्रामपंचायतींना मुदत वाढवून दिली
जलव्यवस्थापन समितीमध्ये यावर चर्चा झाली. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाने वसुली थकीत असलेल्या ग्रामपंचायतींना मुदत दिल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.