नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. या बंदला बऱ्याच ठिकाणी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद पाहिला मिळत आहे. मात्र, या बंदमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकालाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सलाम आणि मानाचा मुजरा केला आहे. तसेच आज भारत बंदला अधिक यशस्वी करावं आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
बच्चू कडूंची मोटार सायकल रॅली
गेल्या १३ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. कडाक्याच्या थंडीत शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. यासंदर्भात उद्या ९ डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान, बच्चू कडू दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोटार सायकल रॅली घेऊन दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. आज ते उत्तर प्रदेशच्या दिशेने रवाना झाले असून दहा तारखेपर्यंत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.
डाकूप्रमाणे केंद्र सरकारची भूमिका
केंद्र सरकारचा आता अतिरेक होत असून एखाद्या डाकूप्रमाणे केंद्र सरकारची भूमिका दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी लुटून जात असल्याचा, आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. ‘भारत बंद’मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकालाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सलाम आणि मानाचा मुजरा केला आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचं आंदोलन