मुंबई : गत विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात विद्यमान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे. त्यावरून महाराष्ट्र भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शरद पवार यांच्या स्वभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे झाले असल्याची टीका भाजपाने केली आहे.
हेही वाचा – ‘हे’ धोरण इस्रायलने भारताकडून स्वीकारले की…? ठाकरे गटाचा भाजपाला टोला
कंत्राटी भरतीवरून गेले दोन दिवस राज्यांत वातावरण तापले होते. कंत्राटी भरतीचा शासननिर्णय रद्द करण्यात आल्याची घोषणा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पाप शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे असल्याचा आरोप केला आहे. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची नाक घासून माफी मागावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते.
आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष @cbawankule यांचं जेवढं वय आहे त्याहून अधिक वर्षे शरद पवारजी यांची राजकीय कारकीर्द आहे. आपल्याहून लहान कार्यकर्त्याला बळ देणं, प्रोत्साहन देणं हे पवारांना माहिती नाही म्हणून ते बावनकुळेजींविरोधात बोलले आहेत. हाच त्यांच्या राजकारणाचा स्वभाव राहिला आहे.…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 23, 2023
बारामतीमध्ये काल, रविवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये बावनकुळे यांच्या या मागणीसंदर्भात विचारले असता, शरद पवार यांनी बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. या व्यक्तीचे जनमानसात नक्की काय स्थान आहे, हे मला माहिती आहे. ते आता भाजपा प्रदेशाध्यक्ष आहेत. जेव्हा मागची विधानसभा निवडणूक झाली होती. तेव्हा भाजपाने बावनकुळेंना तिकीट देखील दिले नव्हते. भाजपा हा त्यांना तिकीट देण्यासाठी सुद्धा लायक समजत नाही, अशा व्यक्तीबद्दल आपण काय बोलायचे, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी बावनकुळे यांच्यावर केली आहे.
हेही वाचा – Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, पाच दिवसांत चौथ्या आंदोलकाची आत्महत्या
यावरून महाराष्ट्र भाजपाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे जेवढे वय आहे त्याहून अधिक वर्षे शरद पवार यांची राजकीय कारकीर्द आहे. आपल्याहून लहान कार्यकर्त्याला बळ देणे, प्रोत्साहन देणे हे पवार यांना माहिती नाही म्हणून ते बावनकुळे यांच्याविरोधात बोलले आहेत. हाच त्यांच्या राजकारणाचा स्वभाव राहिला आहे. त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले आणि त्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल आम्ही बोलायची गरज नाही. त्यांचे सहकारी अजित पवार आणि छगन भुजबळ यावर बोलले आहेत, असे प्रत्युत्तर भाजपाने दिले आहे.
भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचे काम बघून त्यांना भाजपने प्रदेशाध्यक्ष केले आहे. संघटना सर्वोपरी या धारणेने ते काम करत आहेत, असे सांगून, शरद पवार आणि विरोधकांना बोलायला मुद्दे नाहीत, त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आहेत; पण आम्ही पवार आणि ठाकरे यांना प्रश्न विचारत राहणार. हिंदू धर्म संपविणाऱ्या स्टॅलिनला तुमचे समर्थन आहे का? असा सवाल महाराष्ट्र भाजपाने केला आहे. कंत्राटी भरतीसाठीचा जीआर काढून तशी भरती प्रक्रिया राबविल्याबद्दल आणि नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या तरुण पिढीची फसवणूक केल्याबद्दल माफी कधी मागणार? असा प्रश्नही भाजपाने केला आहे.