घरमहाराष्ट्रविरोधी पक्षाची कसोटी पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात

विरोधी पक्षाची कसोटी पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने विधिमंडळातील विरोधी पक्षाचे संख्याबळ कमालीचे घटले आहे. काल परवापर्यंत विरोधी बाकावरून सरकारवर घणाघाती हल्ला करणारे अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे सरकारचा भाग झाल्याने विरोधी पक्षाचा आवाज काहीसा क्षीण झाला आहे. या अधिवेशनात विधानसभेत जवळपास २००पेक्षा अधिक आमदार सत्ताधारी बाकांवर दिसणार आहेत. त्यामुळे राज्यातील ज्वलंत प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरताना विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षाची कसोटी लागणार आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून मुंबईत सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या तोंडावर अजित पवार यांच्या गटाने भाजपशी संधान साधल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या बदललेल्या राजकीय समीकरणांचे पडसाद अधिवेशनात उमटून राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने येऊन काही राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे, तथापि सरकारमधील अंतर्गत कलहाचा फायदा उठवत सरकारला कोंडीत पकडण्याची संधी विरोधी पक्षाकडे आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट, भाजप आणि अपक्ष आमदारांचा झालेला हिरमोड तसेच खातेवाटपावरून शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये असलेली धुसफूस यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीआधी विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या लक्षणीय होती, मात्र अजित पवार ३५ ते ४० आमदारांना घेऊन सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्याने विरोधी पक्षातील आमदारांची संख्या आता ८०च्या आसपास खाली आली आहे. अशातच राष्ट्रवादीतील फूट विधानसभा अध्यक्षांनी अजून मान्य न केल्याने विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम आहे. विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा असला तरी जोपर्यंत विधानसभा अध्यक्षांकडून अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत हे पद रिक्त राहणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचे सुरुवातीचे कामकाज विरोधी पक्षनेत्याविना पार पडण्याची शक्यता आहे.

अधिवेशनात हे मुद्दे गाजणार
– सरकारी यंत्रणांचा वापर करून अथवा सत्तेचे आमिष दाखवून विरोधी पक्षांमध्ये पाडली जाणारी फूट
– खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात दुर्घटना होऊन १४ जणांचा झालेला मृत्यू
– अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदी ठिकाणी झालेल्या जातीय, धार्मिक तणावाच्या घटना
– कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ
– मुंबईतील वसतिगृहात विद्यार्थिनीची झालेली हत्या
– पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांवर ओढावलेले दुबार पेरणीचे संकट, बोगस बी बियाणांची समस्या
– कृषिमंत्री असताना अब्दुल सत्तार यांच्यावर धाडी प्रकरणात झालेले आरोप
– मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप
– नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका

- Advertisement -

चहापानावर बहिष्कार?
विरोधी पक्षात फूट पाडून विरोधी पक्षाला कमकुवत करण्याच्या कूटनीतीचा तसेच राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ता टिकविण्याच्या खेळात रममाण झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध म्हणून विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांनी आज रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकू शकतो.

मोजक्या नेत्यांवर विरोधी पक्षाची मदार
अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे हे सत्ताधारी बाजूला बसल्याने विरोधी पक्षाची मदार आता काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सुनील प्रभू यांच्यावर असणार आहे.

मंत्र्यांचा परिचय आणि पुरवणी मागण्या
दरम्यान, सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा परिचय करून दिला जाईल. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सन २०२३-२४ या वर्षातील पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. पुरवणी मागण्यांमध्ये शेतकर्‍यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या नमो शेतकरी, पीक विमा योजना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना आदींसाठी निधीची तरतूद अपेक्षित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -