ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार असलेल्या मोहर्ली गावापासून, सुमारे ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या भामडेळी गावात एका वाघाचा दुर्देवी अंत झाला. भामडेळी गावातील एका शेतात ३ वर्षांचा युवा वाघ विजप्रवाहाच्या धक्क्याने मृत्युमुखी पडला. या घटनेमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. ताडोबाच्या बफर क्षेत्रात मागील दोन महिन्यांपासून फिरत असलेला वाघ भद्रावती येथून स्थलांतरीत होऊन भामडेळी येथे आला. येथील जंगलालगत असलेल्या शेताजवळ जाताच त्याला विजेचा धक्का बसला. ऋषी ननावरे या शेतमालकाने वन्यजीवांपासून पीक वाचवण्यासाठी कुंपणाला विजेचा प्रवाह दिला होता. याच कुंपणामध्ये हा वाघ अडकला. मात्र, भीतीपोटी त्यानं माहिती लपवून ठेवली. ती वनविभागाला मिळाल्यावर सर्व अधिकारी घटनास्थळी पोचले. याप्रकरणी शेतमालकास ताब्यात घेण्यात आलं असून मोहर्ली येथील रोपवाटिकेत शवविच्छेदन करण्यात आलं.
विशेष म्हणजे या वाघाला कॉलर आयडी लागलेली होती. त्यामुळं त्याचं प्रत्येक लोकेशन वनविभागाला ठाऊक होतं. असं असतानाही भली मोठी सुरक्षा यंत्रणा काय करीत होती, हा प्रश्नच आहे. ज्या भागात वाघाचं वास्तव्य आहे, त्या संपूर्ण भागाची पाहणी का केली गेली नाही, पीक शेतात असल्याने वीजप्रवाह सोडला जातो, हे सर्वश्रुत असताना शेतांची पाहणी का केली गेली नाही, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मागील महिन्यात रेल्वेच्या धडकेने वाघाची तीन पिल्लं ठार झाली होती. त्यानंतर हा मोठा वाघ मरण पावल्याने वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे वाघांची संख्या झपाटीने कमी होत असताना, दुसरीकडे अशाप्रकारच्या घटना घडणं खेदजनक आहे.