घरमहाराष्ट्रतीन नेत्यांच्या आशीर्वादानेच सरकार सुरक्षित

तीन नेत्यांच्या आशीर्वादानेच सरकार सुरक्षित

Subscribe

महाविकास आघाडीत सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर सावध उत्तर दिले. सरकारमधील सगळ्या तिन्ही पक्षांच्या विचारधारा या वेगवेगळ्या आहेत. या सरकारवर उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांचा जोपर्यंत आशीर्वाद आहे तोपर्यंत काहीही होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

अद्याप आपले अशोक चव्हाण यांच्याशी बोलणे झाले नाही. त्यामुळे ते नेमके काय बोलले ते मला समजू द्या. कारण एखाद्या गोष्टीचा ‘म’ चा ‘ध’ केला जातो. त्यामुळे बोलतांना खूप तोलून मापून बोलावे लागते. लवकर मला इथून निघून जाऊ द्या नाहीतर माझ्या तोंडातून एखादा शब्द बाहेर जाईल, असे सांगत अजित पवार यांनी या वादावर अधिक बोलण्याचे टाळले.

- Advertisement -

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळे महाआघाडीत ठिणगी पडली. सरकारमध्ये येताना शिवसेनेकडून घटनेप्रमाणे काम करणार असे लिहून घेतले असे वक्तव्य चव्हाणांनी केले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाराज असल्याची माहिती आहे. चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे अकारण गैरसमज पसरले आहेत. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचे मुख्यमंत्र्यांचे मत आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये टाळावीत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अशोक चव्हाणांनी असे वक्तव्य का केले हे माहिती नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तीन वेगवेगळ्या दिशेला तोंडे असणारे पक्ष राज्यात एकत्रित येत महाविकास आघाडी स्थापन झाली खरी पण शपथविधी होऊन पन्नास दिवस पूर्ण होत नाही तोच महाविकास आघाडीतील वेगवेगळ्या नेत्यांची विधान महाविकास आघाडीचे अंतर्गत कलह वाढवणारी ठरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -