अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी गावात वाघाची प्रचंड दहशत असून शेतीची सर्व कामं ठप्प झाली आहे. वाघाच्या भीतीने गावकरी रात्र रात्र जागून काढत असल्याचे दिसून येत आहे. वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम उभा करणे कठीण झाले आहे. कापूस वेचणी थांबली आहे. वाघाच्या भीतीने पाळीव जनावरे गावातचं बांधून ठेवण्यात येत असल्याने चराईचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणाला मोठ्या प्रयत्नानंतर पाणी सोडण्यात आले आहे. परंतू वाघाच्या दहशतीमुळे कुणीही ओलितास जाऊ शकत नसल्याने धरणाचे पाणीही वाया जात असल्याचे सांगितले जात आहे.
ग्रामस्थ मशाल घेऊन वाघाच्या शोधात
वाघाच्या दहशतीमुळे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून शिक्षण विभागाने कुऱ्हा परिसरातील आठ शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. यात कुऱ्हा, दुरुगवाडा, आखतवाडा, सिंदवाडी, मारडा, बोर्डा, मूर्तिजापूर आणि कौंडण्यपूर येथील जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. तर वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून परिसरात या वाघाचा मुक्काम असून अंजनसिंगी, कौंडण्यपूर भागातील २२ गावं अलर्ट करण्यात आली आहेत. परिसरातील गावं वाघाच्या दहशतीत आली आहे. शनिवारी रात्री गाव परिसरात वाघ शिरला असल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थ मशाल (टेंभे) घेऊन घराबाहेर पडले. झाडा, आष्टा, गिरोली, चिंचोली, येरली, सोनोरा काकडे, गोकुळसरा या गावातील लोकांनी रात्रभर त्याचा शोध घेतला. तरी एकाच ठिकाणी या वाघाचा मुक्काम असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या हालचाली वनविभागाने लावलेल्या तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. मोर्शी, वरूड, परतवाडा, अमरावती येथील ३१ बंदूकधारी कर्मचारी मागावर आहेत. दिघी खानापूर आणि नाकाडाच्या घनदाट जंगलात या वाघाने दोन दिवसांपासून मुक्काम ठोकला होता.
तीन दिवसात वाघाचे दोन बळी
चारा आणायला गेलेले अंजनसिंगि येथील शेतकरी, मोरेश्वर वाळके काल, सोमवारी सायंकाळी पाच वाजल्या पासून बेपत्ता होते. त्यांची सायकल तसेच चारा सापडल्याने शिवाय मोरेश्वरराव बेपत्ता झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. वाघाच्या भीतीने अंजनसिंगि परिसरातील अनेक नागरिक वाघाच्या दहशतीखाली जागरण करून रात्र काढत होते. ज्ञानेश्वर वळकेचा शोध वन विभागाची शोध मोहीम सुरूच करून आज सकाळच्या सुमारास राठी यांच्या शेतजवळ त्याचा मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था पाहून हा वाघाने केलेला हल्ला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
मंगरूळ दस्तगीर येथील राजेंद्र निमकर यांचा शुक्रवारी वाघाने शेतात बळी घेतला. त्यानंतर वन विभागाने वाघाचा संचार पाहण्यासाठी बांधण्यात आलेली वगारही वाघाने फस्त केली. रविवारी रात्री या नरभक्षक वाघाने दिग्गी महल्ले शेतशिवरातील नाकाळी जंगल सोडत रात्री शिदोडी गाव गाठले.
वाघाला पकडण्यासाठी सापळा लावला
गावात खुट्याला बांधलेल्या विनोद निस्ताने यांचे दोन वर्षाचे वासरू वाघाने फस्त केले. सोमवारी सकाळी वाघ अंजनसिंगी-पिंपळखुटा रस्त्यावर शोभमाता मंदिर परिसरातून मदर टेरेसा इंग्लिश मिडियम स्कूलकडे आला. यावेळी शंकर भोयर याने आणि मदर टेरेसा शाळेतील शिपायाने वाघाला पाहिले. त्यांनी आरडाओरड केल्याने वाघ शरद राठी यांच्या शेताकडे गेला असल्याचे नागरिकांनी सांगितले. वनविभागाने शरद राठी यांच्या शेतामध्ये तसेच परिसरात सहा ते सात ठिकाणी सापळे रचून जाळे लावले होते. त्यातच सोमवारी मोरेश्वर वाळके हे चार आणण्याकरिता शेतात गेले असता ते बेपत्ता झाले आणि आज त्यांचा मृतदेह सापडला.