मुंबई : अंधेरीच्या ‘सात बंगला’ परिसरातील एक बंगला पाडण्याची नोटीस मुंबई महापालिकेने बजावली आहे. ही नोटीस पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या निष्कर्षांवर आधारित आहे, परंतु यामागे एक षडयंत्र असल्याचे आरोप या मालमत्तेच्या को-ओनर शालू राहुल ब्रार आणि त्यांच्या दोन मुलांनी केला आहे.
हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
सात बंगला परिसरात सुमारे 124 वर्षांपूर्वी सात बंगले बांधण्यात आले होते, पण आता केवळ दोनच राहिले आहेत. त्यातील एक पाडण्याची नोटीस बीएमसीने बजावली आहे. समुद्रकिनारी बांधलेल्या या बंगल्यात अनेक खोल्या आहेत ज्यात छत, स्टेन्ड ग्लास वर्क असलेला भव्य हॉल, इटालियन संगमरवरी मजले, बेसाल्ट स्टोन फ्लोअरिंग आणि एक विहीर आहे जी ‘1900 AD’मधील बांधकामाचा पुरावा देते. पण ते आता लवकरच इतिहास जमा होईल.
मुंबई महापालिकेने 29 फेब्रुवारी रोजी रतन कुंज नावाच्या या बंगल्याच्या मालकांना तो रिकामा करण्याची नोटीस बजावली आहे. हे बांधकाम उद्ध्वस्त अवस्थेत असून ते कोसळण्याची शक्यता आहे, असे कारण पालिकेने दिले आहे. रतन कुंजच्या को-ओर शालू ब्रार यांचा त्याला विरोध आहे. नोटीस 29 फेब्रुवारीला चिकटवली असली तरी ऑर्डर 2 तारखेची आहे. त्यामुळे आम्हाला कार्यवाहीसाठी योग्य वेळ देण्यात आला नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो आहोत. न्यायालय आमचे म्हणणे ऐकून घेईल, अशी आम्हाला आशा आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य येथे घालवले आहे, आता मी कुठे जाणार? दीड वर्षांपूर्वी माझ्या पतीचा मृत्यू झाला. ते एकूण सहा भाऊ होते. प्रत्येकाची मते वेगवेगळी आहेत, पण आम्हाला हा वारसा गमवायचा नाही, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Jitendra Awhad : एवढे तर महात्मा गांधी देखील चालले नाहीत…; जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य
आमच्या ऑडिट आणि इनटेक अहवालात ही मालमत्ता जतन केली जाईल, असे म्हटले आहे, किरकोळ दुरुस्ती करण्यास सांगितली आहे, परंतु थेट पाडण्याची नोटीस आमच्यासाठी मोठा धक्का आहे. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहोत, असे अन्य एक को-ओनर ध्रुव ब्रार म्हणाले. विकासासोबतच असा वारसा जपणेही गरजेचे आहे. म्हणून, सुरुवातीच्या ‘वारसा यादी’मध्ये समाविष्ट न झालेल्या अशा वास्तूंचा समावेश केला पाहिजे, असे या कुटुंबाचे म्हणणे आहे.
एकेकाळी ही वास्तू “तलाटी बंगला” म्हणून ओळखला जात होता, सोराबजी तलाटी या पारशी कुटुंबाच्या नावावरून ते ठेवण्यात आले होते. त्यावेळी ते या बंगल्याचे मालक होते. 1896मध्ये शहरात प्लेगने थैमान घातल्यानंतर वर्सोवा येथील ‘सात बंगले’ बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यांचे मूळ मालक ग्वाल्हेरचे महाराज, कच्छचे महाराज, दादाभाई नौरोजी, विद्वान रुस्तम मसानी, सोराबजी तलाटी, चिनाई आणि खंबाटा होते, असे सांगितले जाते.
ब्रिटन किंवा इतर देशांमध्ये जुन्या ऐतिहासिक वास्तू पाहून आपण प्रशंसा करतो आणि दुसरीकडे आपल्या देशातील अशा 124 वर्षे जुनी अभिनव वास्तू पाडू इच्छितो. वारसा यादीत हा बंगला समाविष्ट करून ते जतन करा, ही सरकारला विनंती आहे. विकास करा, पण इतिहास जतन करा. अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही येथे झाले आहे. इम्तियाज अलीच्या चित्रपटासोबत अनेक वेगवेगळ्या चित्रपट, मालिका, जाहिरातींचे शूटिंग झाले आहे. या आठवणी आणि सौंदर्य पुसून टाकू नका, असा आवाहन को-ओनर वेदांत ब्रार यांनी केले आहे.
हेही वाचा – Maharashtra Politics : रेल्वे कोच कारखान्याच्या लोकार्पणावरून देशमुख-निलंगेकर आमनेसामने