महिलांना मासिक पाळी येण्याचे सरासरी वय साडेअकरा वर्षापर्यंत आले असताना, महिलांची मेनोपॉज अवस्था येण्याचे वयसुद्धा वाढत असल्याचं निरीक्षण स्त्रीरोगतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. साधारण ४५ वयापर्यंत येणारी मेनोपॉज अवस्था आता ४७ वर्यापर्यंत येत असल्याचे मत जे. जे रुग्णालयाचे स्त्रीरोगतज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ. अशोक आनंद यांनी जागतिक रज्जोनिवृत्ती दिनानिमित्त स्पष्ट केलं आहे. जन्मतः निसर्गाने दिलेली स्त्रीत्वाची ओळख म्हणजे महिलांमधील मासिक पाळी येणारी अवस्था असते. सध्याच्या जीवनशैलीने स्त्रीत्वाचे अस्तित्वच शरिरातून कमी होऊ लागल्यावर महिला असल्याची ओळख लोप पावत असते. महिलांमध्ये बीजग्रंथीचे कार्य संपुष्टात येते आणि बीज उत्सर्जन बंद पडल्यामुळे किंवा बीज ग्रंथीमध्ये आंतस्त्राव तयार होणे थांबल्यामुळे मासिक पाळी कायमची बंद होते. या प्रक्रियेला रजोनिवृत्ती (मोनोपॉज) असं म्हणतात. रजोनिवृत्ती हळूहळू किंवा एकदमच होऊ शकते. रजोनिवृत्ती झाल्यावर स्त्रीमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही बदल घडतात. वय वाढत असताना अंडाशयाचा क्रियाशीलतेचा वेग कमी होतो. ही अवस्था येत असताना महिलांमध्ये चिडचिडपणा, मूड स्विंग्ज, हॉट फ्लशेस अशा तक्रारी उद्भवतात.
“मासिक पाळीचे वय कमी होऊन सरासरी साडे अकरापर्यंतच्या वयात हल्ली मुलींना मासिक पाळी येते. कधी-कधी नवव्या वर्षी देखील मासिक पाळी येऊ लागली आहे. तसंच मेनोपॉजचे वय देखील वाढलं असून, ते सर्वसाधारण ४७ इतके झाले आहे. मात्र, सध्या सरासरी ५० वयानंतरही मेनोपॉजची अवस्था येऊ लागली आहे.”
– डॉ. अशोक आनंद, स्त्रीरोगतज्ज्ञ विभागप्रमुख, जे जे रुग्णालय.
मोनोपॉजमध्ये शरीरात झालेल्या बदलांमुळे मानसिक ताण, हृदयात धडधड होणे, घाम येणे, अंग गरम होणे, अतिसार, वारंवार लघवीसारखे वाटणे, तोंडाला कोरड पडणे, झोप कमी होणे, हातापायात कंप सुटणे अशी लक्षणे आढळून येतात.