शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक यांचा क्वारंटाईन काळ पूर्ण झाल्यामुळे काल (मंगळवार) त्यांनी सहकुटुंब सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळेस त्यांनी सरनाईक कुटुंबियांवरील ईडा-पिडा टळो असं बाप्पाकडे गाऱ्हाणं घातलं आहे. हेच गाऱ्हाणं बाप्पाने ऐकलं आहे आणि प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ईडीला आदेश दिले आहेत. एक प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तूर्तास कारवाई नको, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले आहे.
नेमकं काय प्रकरण?
टॉप सिक्युरिटी ग्रुप प्रकरणी सध्या प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरू होती. २४ नोव्हेंबरला टॉप सिक्युरिटी ग्रुप प्रकरणी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक यांच्यासह सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. मग त्यानंतर विहंग यांची ईडीने तब्बल पाच तास चौकशी केली होती. ईडीने प्रताप सरनाईक यांना देखील समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण ते परदेशात असल्यामुळे चौकशीसाठी हजर राहू शकले नाही. त्यानंतर ते मुंबई दाखल झाल्यानंतर आठ दिवस ते क्वारंटाईन झाले होते. तसेच विहंग यांची पत्नी देखील आजरी होत्या. त्यामुळे ईडीने नंतर देखील समन्स बजावूनही ते उपस्थित राहिले नाहीत. मग त्यांनी ईडीला क्वारंटाईन असल्यामुळे पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली होती.
पण आता सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोणतीही कारवाई करू नये, असे ईडीला आदेश दिले आहेत. तसंच ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. पण त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट नमूद केलं आहे.
हेही वाचा – ‘सरनाईक कुटुंबावरील ईडा-पिडा टळो’