अग्निशमन दलाच्या सेवेत रुजू होऊन जेमतेम तीन महिने झाले नाही तर त्यांना लगेच सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. या विरोधात ते गेली १९ वर्ष लढा देत होते. अखेर १९ वर्ष न्यायालयीन लढा दिल्यानंतर सुनील यादव या जवानाला न्याय मिळाला असून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर १९ वर्षांनी तो पुन्हा सेवेत रुजू झाला असून आगीशा झुंज देण्यासाठी सज्ज झाला आहे.
का केले होते सेवेतून बडतर्फ
मुंबई अग्निशमन दलात सुनील यादव २००० मध्ये जवान या पदावर काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र तीन महिन्यांनी यादव यांच्या पत्नीने आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र आपला काहीच दोष नसल्याचे तो ओरडून सांगत होता. मात्र, त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. अखेर त्यांनी न्यायालयाचे द्वार ठोठावले, परंतु कामगार न्यायालय ते उच्च न्यायालय, असे तब्बल १९ वर्षे त्याचा हा लढा सुरु राहिला होता. अखेर उच्च न्यायालयाने सुलीलच्या बाजूने कौल दिल्यामुळे गेल्या महिन्यात अग्निशमन दलाने पत्र पाठवून त्याला कामावर रुजू होण्यास दहा दिवसांची मुदत दिली. त्यानुसार, धारावी येथील अग्निशमन केंद्रात हंगामी अग्निशमक या पदावर यादव रुजू झाले आहेत.
वेतनाची थकबाकी मिळणार
१९ वर्षांच्या वेतनाची थकबाकी आणि इतर फायदेही मिळणार असल्याची माहिती यादव यांची न्यायालयात बाजू मांडणारे आणि मुंबई महापालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अॅड. प्रकाश देवदास यांनी दिली आहे.