राज्यात सत्तास्थापनेवरून महायुतीमधील दोन प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. या वातावरणात पक्षीय बलाबल वाढवण्यासाठी आमदार फोडण्याचे प्रकार घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब यांनी आपल्या आमदारांना इशारा दिला आहे. आमचा कोणताही आमदार पक्ष सोडण्याचे धाडस करणार नाही, असा दावाच बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. राज्यातील सत्तास्थापनेवरुन सुरु असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला बाळासाहेब थोरात उत्तर देत होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीसुद्धा ट्विटरच्या माध्यमातून एकही आमदार पक्ष सोडणार नाही. एवढेच नाही तर त्यामागचे कारणदेखील त्यांनी ट्विटमध्ये सांगितले होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सामना करावा लागेल
काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती वाटते का? पत्रकारांच्या या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, “आमदार फुटतील अशी भीती आम्हाला मुळीच नाही. कारण, राज्यातील जनमत भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे कोणताही आमदार पक्ष सोडण्याचे धाडस करणार नाही. तरीही कोणी तशी हिंमत केलीच दर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिघेजण एकत्रितपणे त्या आमदाराचा पाडाव करतील, असा सज्जड दम बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचीत आमदारांना भरला.
आमदार फुटण्याची हिम्मत करणार नाही – सत्यजित तांबे
सत्यजित तांबे म्हणाले की, “सातारा लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे, उदयनराजे होण्याच्या भितीने एकही आमदार फुटण्याची हिम्मत करु शकत नाही… लोकशाहीचा विजय असो!” सत्यजित तांबे यांचे मत किती खरे ठरणार हे येणारा काळच ठरवेल.
सातारा लोकसभा पोटनिवडणूकीच्या निकालामुळे , उदयनराजे होण्याच्या भितीने एकही आमदार फुटण्याची हिम्मत करु शकत नाही… लोकशाहीचा विजय असो !
महाराष्ट्रातील जनतेची भावना भाजपाचं सरकार येऊ नये हीच आहे.— Satyajeet Tambe (@satyajeettambe) November 3, 2019