मुंबईत पावसाने जरी थोड्या प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी वातावरणात वाढलेल्या उष्म्यामुळे मुंबईकरांमध्ये ताप, खोकला, सर्दी आणि डोकेदुखी या आजारांनी भर केली आहे. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला साथीच्या आजारांची लागण होत आहे.
मुंबईत सप्टेंबर महिन्यात लेप्टोमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसंच, मलेरियाच्या ६६६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ गॅस्ट्रोच्या ४२५ रुग्णांची नोंद झाली आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे व्हायरल ताप, सुका खोकला, घशात खवखव अशा समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ
तसंच, महिन्याभरात ३ हजार ५२७ डेंग्यूसदृश्य रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. तसंच, मुंबईत पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे लेप्टोच्या रुग्णांतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे, कोणत्याही तापाच्या रुग्णावर डॉक्सिसायक्लीन ही गोळी उपचार म्हणून द्यावी, असे निर्देश प्रत्येक दवाखान्यांना देण्यात आले असल्याचंही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यासोबतच, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आकडेवारीवरुन दिसत आहे.
हेही वाचा – अखेर भाजपा-शिवसेना युती झाली हो…!
लेप्टोने दोघांचा मृत्यू
के पश्चिममधील ६१ वर्षीय पुरुषाचा आणि के पूर्वमधील ४३ वर्षीय महिलेचा लेप्टोने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या दोघांमध्ये ताप, थंडी, डोकेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा ही सर्वसाधारण लक्षणं होती. त्यामुळे, कोणत्याही प्रकारच्या तापाच्या रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू करण्याच्या सुचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना मुंबई महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितलं की, “साचलेल्या पावसाच्या पाण्यातून जास्त वेळ चाललेल्या व्यक्तींनी ७२ तासांच्या आत उपचार करुन घ्यावेत. तसंच, खाजगी हॉस्पिटलमध्येही तापाच्या रुग्णांना डॉक्सिसायक्लिन सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल त्यांनी आजार अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”
काय काळजी घ्याल?
- आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवा.
- उंदरांच्या सुळसुळाटाबाबत पेस्ट कंट्रोल ऑफिसरकडे तक्रारी करा.
- घाणेरड्या पाण्यातून चालताना गम बुटचा वापर करा.
- अति ताप, डोकेदुखी, डोळे येणे, अशक्तपणा अशी लक्षणं दिसली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- गर्भवती महिला आणि लहान मुलांवरही ७२ तासांमध्ये उपचार केले जावेत.
- लवकर निदान आणि त्यावर तात्काळ उपचारांमुळे आजारांचं प्रमाण रोखता येऊ शकतं.
मुंबईतील आजारांची आकडेवारी
रुग्ण मृत्यू
मलेरिया ६६६ ०
लेप्टो ५५ २
स्वाईन फ्लू ९ ०
गॅस्ट्रो ४२५ ०
हेपेटायटीस १०५ ०
डेंग्यू २३३ ०