“चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये घर घेतले आहे, तर गोपीचंद पडळकर यांनी बारामतीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघांचेही स्वागत करतो. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जो उमेदवार असेल तो कमीतकमी १ लाख मतधिक्यांने बारामतीकर निवडून देतील. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. आम्ही काट्याने काटा काढणार असून सुरुवात त्यांनी केली आता शेवट आम्ही करणार आहोत”, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी राजीनामा देऊन माध्यमांसमोर भावूक झालेले अजित पवार पुन्हा एकदा अॅक्शन मोड आल्याचे आज दिसले.
बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जात असल्याचे समजते. आम्ही विरोधी पक्षाला कधीच कमकुवत समजत नाही. प्रत्येक उमेदवारास आम्ही तुल्यबळ उमेदवार मानतो. पण कोणीही असूदे, राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीची जागा दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आणणार – @AjitPawarSpeaks pic.twitter.com/764WURkFSk
— NCP (@NCPspeaks) September 30, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीमधून आऊटगोईंग होत असले तरी राष्ट्रवादीत एका विद्यमान आमदाराने प्रवेश केला आहे. काँग्रेसचे पंढरपुरमधील आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तसेच शहापुरचे शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करत हाती घड्याळ घेतले. भारत भालके हे सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व आहेत. तर दौलत दरोडा हे शहापुरचे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. या दोघांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी स्वागत केले.
#Live – अजित पवारांची पत्रकार परिषद लाईव्ह
आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 30, 2019
अब की बार आघाडी १७५ पार
“पांडुरंग बरोरा आणि त्यांचे वडील पवार साहेबांचे कट्टर समर्थक होते. मात्र पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. दौलत दरोडा यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते पांडुरंग बरोरा यांच्या आधी आमदार झाले होते, अशी टीका अजित पवार यांनी केली.
आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार
आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही त्याबाबत मित्रपक्षांशी चर्चा करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. सुप्रिया सुळे यांना पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा दिला होता. ती काही पंचवार्षिक निवडणूक नव्हती. आदित्य यांना सहकार्य करायचे ठरवलेच तर मित्रपक्षांशी चर्चा करणार कारण आधीच वरळीची जागा त्यांनी मागितली आहे, असेही अजित पवार म्हणाले. आघाडीची घोषणा २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तीन वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल. काही मित्र पक्षांच्या जागांबाबत निर्णय घ्यायचा आहे ते झालं की आघाडी जाहीर करू असेही अजित पवार यांनी सांगितले.
साताऱ्याची जागा आमचीच
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादी ती जागा निवडून आणत आली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव काँग्रेसतर्फे चर्चेत आहेत. ते जागा लढले नाही तर आम्ही लढू. लवकरच उमेदवाराची घोषणा करू असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.