मुंबई: आंतरजातीय विवाहांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीवर माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टिका केली आहे. ही समिती म्हणजे जाती व्यवस्था म्हणजेच चातुवर्ण व्यवस्था मजबूत करण्याचे काम सुरु आहे, असा आरोप आव्हाड यांनी बुधवारी केला.
मंगळवारी राज्य शासनाने ही समिती स्थापन केली. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन समितीवर टीका केली. ते म्हणाले, आंतरजातीय/धर्मीय विवाहांची मोजदाद करण्याचा सरकारला काय अधिकार आहे? पुरोगामी महाराष्ट्राला २०० वर्षे मागे न्यायचंय काय? कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे. सरकारने हे पाऊल तातडीने मागे घ्यावं, अशी मागणी आव्हाड यांनी ट्विटमध्ये केली आहे. आव्हाड यांच्या ट्विटला अजून शिंदे- फडणवीस सरकारने उत्तर दिलेले नाही. मात्र ही समिती म्हणजे चातुवर्ण व्यवस्था मजबूत करण्याचे काम सुरु आहे, या आव्हाड यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आंतरजातीय/धर्मीय लग्नांची मोजदाद करण्याचा सरकारला काय अधिकार आहे? पुरोगामी महाराष्ट्राला २०० वर्षे मागे न्यायचंय काय? कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे. सरकारने हे पाऊल तातडीने मागे घ्यावं.जाती व्यवस्था म्हणजेच चतुरवर्ण व्यवस्था मजबूत करण्यासाठी हे काम चालू आहे pic.twitter.com/GzFYAooeMc
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 14, 2022
बाल व महिला कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. १३ सदस्यांची ही समिती आहे. समितीमध्ये दोन वकील आहेत. नोंदणीकृत व अनोंदणीकृत विवाह व धार्मिक स्थळी झालेले विवाह. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह. पळून केलेले विवाह यांची माहिती घेण्याचे काम ही समिती करणार आहे. तसेच ही जोडपी कुटुंबियांच्या संपर्कात आहेत का याची माहिती घेणे व हे जोडपे संपर्कात नसल्यास त्यांच्याकडून कुटुंबियांची माहिती घेणे. कुटुंबियांचा विवाहाला विरोध असल्यास त्यांचे समपूदेशन करणे. त्यांच्यातील वाद मिटवणे ईत्यादी कामे ही समिती करणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून लव्ह जिहादच्या मुद्द्यावर भाजपच्या अनेक आमदार आणि नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राज्यात वारंवार लव्ह जिहादच्या घटना घडत असल्याचा दावा भाजपच्या आमदारांनी केला. श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येनंतर या मुद्द्यावर खूप चर्चा झाली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी जोर धरत होती.