घरमुंबईलोकसभेत कर्नाटक पॅटर्न?

लोकसभेत कर्नाटक पॅटर्न?

Subscribe

माढ्यातून शरद पवार लढणार

सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच उभे राहणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. राजकारणात कधी कुठला निर्णय घेतला जाईल याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळेच २०१४ ला ‘मी आता वरिष्ठांच्या सभागृहातच राहणार’, असे म्हणणारे शरद पवार आता कनिष्ठ सभागृहात येण्याची तयारी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीला दोन आकडी खासदार नसलेला पक्ष जरी म्हणत असले तरी फडणवीसांच्या वयापेक्षा जास्त संसदीय कारकिर्द असलेला नेता लोकसभेत असणे हे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना जड जाऊ शकते. त्यामुळे २०१९ ला जर त्रिशंकू अवस्था झाली तर लोकसभेत कर्नाटक पॅटर्न राबवला जाण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांची संख्या जरी कमी असली तरी देशभरातील भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची किमया शरद पवार साधू शकतात. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी वयाने आणि अनुभवाने लहान असल्यामुळे याचा फायदा निश्चितच पवार लोकसभेत असताना उचलू शकतील. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात राहुल गांधी अपयशी ठरतात हे उत्तर प्रदेशमध्ये दिसले. एकेकाळचे सहकारी पक्ष असूनही समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने काँग्रेसला यावेळी बाजूला ठेवून आपापसातच आघाडी केली. निवडणूकपूर्व आघाडी आणि त्यानंतर सत्तास्थापनेसाठी लागणार्‍या आघाडीसाठी जी बार्गेनिंग पॉवर लागते, ती पवारांकडे पुरेपूर आहे.

- Advertisement -

आघाड्यांच्या राजकारणात कुणीही विचार करू शकत नाहीत, अशा व्यक्ती पंतप्रधान झालेल्या भारतीय जनतेने पाहिल्या आहेत. १९९६ साली जनता दल (सेक्युलर)चे नेते एच.डी.देवगौडा आणि १९९७ साली इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाले होते. पंतप्रधानपदासाठी लागणारे संख्याबळ नसतानाही हे दोन नेते पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यामुळे शरद पवार हे पंतप्रधानपदाचे दावेदार होऊच शकत नाहीत, असे आजतरी ठामपणे म्हणता येणार नाही.

माढा मतदारसंघात दोन उमेदवारांचा वाद झाला असे चित्र निर्माण करण्यात आले. मग कार्यकर्त्यांनी शरद पवार हेच निवडणुकीला उभे राहिले पाहिजेत, अशी इच्छा लावून धरली. त्यामुळे शरद पवार लोकसभा लढवत आहेत, असं कारण पक्षाकडून देण्यात येत असलं तरी ते न पटण्यासारखं आहे. कारण पक्षातील कोणताही वाद असो तो पवारांच्याने सुटला नाही, यावर विश्वास बसू शकत नाही. याआधीदेखील तटकरेंच्या घरातील वाद असो किंवा सातार्‍यातील दोन राजेंमधला वाद असो… पवारांनी यशस्वीपणे मध्यस्थी केलेली आहे. माढातील उमेदवारीचा वाद पेटता ठेवण्यात काय गणित होते? हे पुढील काही दिवसात कळेलच.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -