लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या १४७ पैकी ३१ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून, ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती १४७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज, बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या मुदतीत १४७ पैकी ३१ उमेदवारांनी माघार घेतली.
मतदार संघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या ही, वर्धा लोकसभा मतदारसंघ १४, रामटेक मतदार संघात १६, नागपूर मतदारसंघ ३०, भंडारा-गोंदिया मतदारसंघ १४, गडचिरोली-चिमूर मतदारसंघ ५, चंद्रपूर मतदारसंघात १३ आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
दुसऱ्या टप्प्याअंतर्गत २७८ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १० मतदार संघात छाननीअंती २७८ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून उद्या, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांची मतदारसंघनिहाय संख्या ही, बुलढाणा १३, अकोला १२, अमरावती ३४, हिंगोली ३४, नांदेड ५५, परभणी २१, बीड ५३, उस्मानाबाद २०, लातूर १२ आणि सोलापूर २४ अशी आहे.