भिवंडी शहरात मागील वर्षभरापासून अल्पवयीन मुलामुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिकांसह कामगार कुटुंबीयांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. भिवंडी शहर परिसरात यंत्रमाग व्यवसायासोबतच गोदाम व्यवसाय फोफावला आहे. त्यामुळे असंख्य मजूर कुटुंबामधील महिला, पुरुष रोजीरोटीसाठी अहोरात्र आस्थापनात उपस्थित राहतात.
या संधीचा फायदा घेत मुलींना फसवून त्यांचे अपहरण करण्यात येते. भिवंडीत मागील वर्षभरात अपहरणाच्या १६० घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यापैकी ७० मुलींचा व १३ मुलांचा शोध घेण्यात यश आले आहे. तर ६० अल्पवयीन मुली व १७ मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
पालक चिंताग्रस्त
भिवंडी शहराचा विचार केल्यास कामगारांचे शहर म्हणून ओळख आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह असंख्य राज्यातील कुटुंबीय भिवंडीत रोजगारासाठी येत आहेत. तुटपुंज्या पगारात कुटुंब चालवीत असताना साहजिकच झोपडपट्टी, चाळीमधून वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबातील मुलांचे अपहरणाचे प्रमाण अधिक आहे हे वास्तव असून आईवडील दोघेही रोजगारासाठी बाहेर जात असल्याने घरातील मुलामुलींवर लक्ष ठेवणार कोण? हा प्रश्न चिंतेचा आहे.