घरमुंबईअनंत चतुर्दशीला श्री गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; भाविकांना केल्या 'या' सूचना

अनंत चतुर्दशीला श्री गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; भाविकांना केल्या ‘या’ सूचना

Subscribe

मुंबई : श्री गणेश चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पांचे वाजतगाजत घरोघरी, मंडळात आगमन झाले होते. मात्र आता दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर मुंबईकर आपल्या लाडक्या ‘बाप्पा’ची अनंत चतुर्दशीला वाजतगाजत, गुलाल उधळत विसर्जन मिरवणूक काढणार आहेत. या लाडक्या बाप्पाला, विघ्नहर्त्याला समुद्र, खाडी, नैसर्गिक व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विधिवत आरती पूजन करून विसर्जित करणार आहेत ; मात्र या मोठ्या प्रमाणातील गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. (Mumbai Municipal Corporation ready for Shri Ganesha immersion on Anant Chaturdashi this instructions to the devotees)

सालाबादप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेचे विसर्जन स्थळी व आवश्यक त्या ठिकाणी तब्बल 10 हजार कर्मचारी, 71 नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधा उपल्बध केल्या आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी 69 नैसर्गिक स्थळांसह एकूण 198 कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था आहे, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ 2) तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांशी वैयक्तिक शत्रुत्व नाही! प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा

सध्या मुंबईत दीड, पाच दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले असून आज सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडत आहे. वास्तविक, गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई महापालिकेकडून गणेश आगमन आणि गणेश विसर्जन याबाबतची जोरदार तयारी सुरू आहे.

- Advertisement -

महापालिकेने केलेली विसर्जन पूर्व तयारी

श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नये व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, यासाठी चौपाटीच्या किनाऱ्यांवर 468 स्टील प्लेट, छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी 46 जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश मूर्ती विसर्जन करताना समुद्रात खोल पाण्यात कोणीही बुडू नये, एखादी अप्रिय घटना घडू नये यासाठी चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 764 जीवरक्षकांसह 48 मोटरबोटी तैनात केल्या आहेत. तसेच, विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी 150 निर्माल्य कलशांसह 282 निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली आहे.
तसेच, महापालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 188 नियंत्रण कक्ष, सुरक्षेच्या दृष्टीने 60 निरीक्षण मनोरे, विविध ठिकाणी 68 स्वागत कक्ष, आरोग्य विभागाकडून 75 प्रथमोपचार केंद्रांसह 61 रुग्णवाहिकादेखील आदी यंत्रणेची तयारी करण्यात आली आहे.
प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’ च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी सुमारे 1,083 फ्लडलाईट आणि 27 सर्चलाईट लावले आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी 121 फिरती प्रसाधनगृहं सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा – लोकसभेच्या 48 जागांवर ‘वंचित’ची तयारी; प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसला सात दिवसांचा अल्टिमेटम

मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा

श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना सुविधा व्हावी, विसर्जनस्थळी एकाच वेळी गर्दी होवू नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा विकसित केली आहे. मायबीएमसी व्हॉट्सअप चॅटबॉट (MyBMC WhatsApp Chatbot) या 8999-22-8999 क्रमांकावरील चॅटबॉटमध्ये यंदा आपल्या नजीकचे गणेश मंडळ व मूर्ती विसर्जनस्थळ शोधण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

विसर्जनादरम्यान घ्यावयाची काळजी

1) समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.
2) मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.
3) अंधार असणाऱ्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाणे टाळावे.
4) महापालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.
5) समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलीस किंवा जीवरक्षकांना कळवावे.
6) अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
7) भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.

हेही वाचा – वेगवेगळ्या सुनावणीस ठाकरे गटाचा विरोध तर, शिंदे गटाकडून नियमांचं उल्लंघन; आजच्या सुनावणीत काय झालं?

अनंत चतुर्दशीला समुद्रात मोठी भरती आणि ओहोटीवेळी नागरिकांनी काळजी घ्यावी

यंदा अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी समुद्रात सकाळी 11 वाजता 4.56 मीटरची भरती आहे. तसेच, सायंकाळी 5.08 वाजता 0.73 मीटरची ओहोटी असून रात्री 11.24 वाजता 4.48 मीटर उंचीची भरती असणार आहे.
तसेच, 29 सप्टेंबर रोजी पहाटे 5.15 मिनिटांनी 0.56 मीटरची ओहोटी, सकाळी 11.37 वाजता 4.71 मीटरची भरती, सायंकाळी 5.49 वाजता 0.36 मीटरची ओहोटी असेल. या भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मत्स्यदंशापासून बचाव करा, वेळीच प्रथमोपचार घ्या

ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. या पार्श्वभूमीवर विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.
1) ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
2) ‘स्टींग रे’ किंवा ‘जेली फिश’चा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तत्काळ नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.
3) जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे.
4) जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
5) मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.
6) जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -