मुंब्रा बायपास मार्गाचे काम येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होऊन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल असे पत्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपकार्यकारी अभियंता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे. त्यामुळे १० सप्टेंबर रोजी आंदोलन स्थगित करण्यात यावे अशी विनंतीही बांधकाम विभागाने राष्ट्रवादीला केली आहे.
नवी मुंबईच्या जेएनपीटी बंदरातून मालवाहतुकीसाठी सोयीचा असलेला मुंब्रा बायपास रस्ता ७ मे २०१८ पासून बंद करण्यात आला असून, ही सगळी वाहतूक ठाणे शहरातून होत आहे. त्यामुळे शहराच्या वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे वाहन चालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. यासंदर्भात स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट घेतली होती.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मार्गाचे काम युध्दपातळीवर करून लवकरात लवकर खुला करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र हे काम धीम्या गतीने सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान आणि शानू पठाण यांनी १० सप्टेंबरपर्यंत काम न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. त्याुनसारच बांधकाम विभागाने हे पत्र पाठवले आहे, मुंब्रा बायपास 135/100 येथे खचला असून, पारसिक बोगद्याजवळ भराव कोसळला आहे. तसेच, रिटेनिंग भिंतीचे काम सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच हे काम पूर्ण होणार असून सप्टेंबर अखेरीस हा मार्ग खुला करण्यात येईल असे कळवले आहे.