शिवसेना-भाजपमध्ये एकीकडे मुख्यमंत्री पदावरून ‘आमचा की तुमचा’ असा छुपा वाद सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार भवनात सोमवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ‘लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला याबद्दल विचारणा केली जात आहे. आता काय होईल? असा सवाल देखील विचारला जात आहे. मात्र, असं असलं, तरी लोकसभा आणि विधानसभा या वेगळ्या असतात’, असं थोरात यावेळी म्हणाले. तसेच, ‘यावेळी बदल निश्चित वाटतोय. राज ठाकरेंच्या सभांमधून मांडलेली भूमिका लोकांना पटली, पण त्याचं मतांमध्ये परिवर्तन झालं नाही. त्यामुळे शंका वाढली असून ती निवडणूक आयोगाने दूर केली पाहिजे’, असं देखील थोरात म्हणाले.
‘मनसेचा आघाडीसाठी प्रस्ताव नाही’
दरम्यान, राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाईल अशी चर्चा सुरू आहे. मात्र, ‘अजूनपर्यंत मनसेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे त्यावर चर्चा झालेली नाही. पण स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, भाकप, माकप आणि वंचितलाही बरोबर घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत’, असं देखील थोरात म्हणाले. तसेच, ‘पुढचा मुख्यमंत्री आमचाच असेल’, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा – मुख्यमंत्री म्हणतात ‘मी पुन्हा येणार’, मग शिवसेनेला काय?
विरोधी आमदारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न
‘भाजप साम, दाम, दंड, भेद अशी रणनीती ठेऊन यश मिळवत आहे. कोणत्याही मार्गाने त्यांना सत्तेत यायचं आहे. पण जनता सगळं पाहात आहे’, अशी टीका करतानाच, ‘राज्यात अनेक ठिकाणी भाजपचे लोक खोट्या अफवा पसरवतात. वातावरण प्रदूषित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षातील लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून त्यांना हतबल करून ते आपल्याकडे ओढत आहेत. ही पद्धत अत्यंत दुर्दैवी आहे’, असंही थोरात म्हणाले.