आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे आदी दिग्गजांच्या सभांचे साक्षीदार असलेल्या ठाणे शहरातील गावदेवी मैदानावरील भूमिगत वाहनतळास स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. भूमिगत वाहनतळामुळे परिसरातील मुले, ज्येष्ठ नागरिक यांची खेळण्या, फिरण्याची हक्काची जागा हिरावून घेतली जाणार आहेच, शिवाय भूजल जलस्त्रोत विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या जनहित याचिकेवरील सुनावणी-दरम्यान, मुंबई हायकोर्टाने गावदेवी मैदानावरील भूमिगत वाहनतळाविषयी ठाणे महापालिका प्रशासनाला बाजू मांडण्यास सांगितले आहे. त्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
जुन्या ठाण्यात अनेक विहिरी आहेत. पाणीटंचाईच्या काळात पर्यायी वापरासाठी या पाण्याचा वापर होऊ शकतो. गावदेवी मैदानालगत असणार्या नौपाडा परिसरात अनेक विहिरी आहेत. भूमिगत वाहनतळामुळे या विहिरींचे जलस्त्रोत कायमचे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच या मैदानात रस्ता, पाण्याची टाकी आणि स्वच्छतागृहाचे अतिक्रमण झाले आहे. भूमिगत वाहनतळामुळे जुन्या ठाण्यातील हे मैदान काळाच्या पडद्यााआड जाणार आहे. वाहनतळ ही शहराची गरज असली तरी त्यासाठी मैदानाचा बळी दिला जाऊ नये, अशी स्थानिकांची भूमिका आहे.
ठाणे शहरात मुलांना खेळण्यासाठी अथवा नागरिकांना फिरण्यासाठी मैदानांची वानवा आहे. रस्ता, स्वच्छतागृह आणि पाण्याच्या टाकीमुळे आधीच मैदानाचा तीस टक्के भाग कमी झाला आहे. भूमिगत वाहनतळामुळे मैदानाची आणखीन दैना होणार आहे. शहर नियोजनात वाहनतळ हवेच, पण त्यासाठी मैदानाचा बळी नको, इतकीच आमची भूमिका आहे.
-डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते